चाळीसगाव, 13 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभा पार पडत आहेत आणि अगदी काही दिवसातच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. असे असताना या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील एके काळी मित्र असलेले मंगेश चव्हाण आणि उन्मेश पाटील यांच्यात लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर चाळीसगाव मतदारसंघाचा 1962 पासूनचा इतिहास नेमका काय आणि 2024 च्या निवडणुकीतील समीकरणे नेमकी काय हे जाणून घेऊयात.
मंगेश चव्हाण विरूद्ध उन्मेश पाटील –
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मंगेश चव्हाण करत आहेत. पहिल्याच टर्ममध्ये ते आमदार झाले. आणि भाजपने विद्यमान आमदाराचे तिकीट कायम राखल्याने मंगेश चव्हाण दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी खासदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, उन्मेश पाटील यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील वातावरण तापलेले पाहायला मिळतंय.
उन्मेश पाटील ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढताएत आमदारकी –
2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलेले उन्मेश पाटील यांचे 2024 च्या निवडणुकीत तिकीट कापण्यात आले. त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर उन्मेश पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. यावेळी ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून जळगाव लोकसभा लढतील असे दिसून येत असतानाच त्यांनी त्यांचे मित्र करण पवार यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. यानंतर त्यांनी भाजपला धारेवर धरत लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रचार केला.
लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार करण पवार यांचा पराभ झाला. यानंतरही शेतकरी, सरकारचे धोरण तसेच नार-पार प्रकल्पावरुन उन्मेश पाटील यांनी राज्यासह केंद्रातील सरकार जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू ठेवले. दरम्यान, त्यांना विधानसभा निवडणुकीत चाळीसगाव मतदारसंघांतून ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असताना त्यांचा मतदारसंघात प्रचार पार पडतोय.
मंगेश चव्हाण यांना मिळणार मोठी जबाबदारी? –
चाळीसगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताएत. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघासाठी मोठा निधी आणि विकासकामे केल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तर राज्यातील बड्या नेत्यांसोबत त्यांचे संबंध असल्याने त्यांना राजकीय वजन प्राप्त झाले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चाळीसगावात पार पडलेल्या जाहीरसभेत त्यांनी मंगेश चव्हाण यांना निवडून दिल्यास त्यांना मोठी जबाबदारी देऊ, असे वचन चाळीसगावकरांना दिले आहे.
2019 मध्ये काय घडलं? –
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मंगेश चव्हाण विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव देशमुख या दोघांमध्ये जोरदार लढत झाल्याचे पाहायला मिळाले होते. या निवडणुकीत मंगेश चव्हाण यांनी 86 हजार 515 मते तर राजीव देशमुख यांनी 82 हजार 228 अशी मते घेतली होती. दरम्यान, 4 हजार 287 मतांनी विजय झाला होता. तर वंचितचे मोरसिंग राठोड यांना 38 हजार 429 मते मिळाली होती. यासोबतच डॉ. विनोद कोतकर यांना अपक्ष म्हणून 4 हजार 617 तर मनसेचे राकेश जाधव यांना 1 हजार 399 मते मिळाली होती. बसपाचे ओंकार केदार यांना 1 हजार 301 तर अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांना 1 हजार 5 मते मिळाली होती. यासोबतच उमेश करपे यांना अपक्ष म्हणून 782 तर नोटाला 1 हजार 677 मते मिळाली होती.
चाळीसगावमधील लढतीकडे राज्याचे लक्ष –
2014 ते 2019 अशी पाच वर्षे उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यानंतर ते 2019 साली लोकसभा खासदार झाले. मात्र, 2024 साली त्यांचे खासदारकीचे तिकीट कापल्याने ते ठाकरेंच्या शिवसेनेत गेले. असे असताना ते पुन्हा चाळीसगावात आमदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे देखील गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताएत. दरम्यान, एकेकाली मित्र असलेले उन्मेश पाटील आणि मंगेश चव्हाण हे आता विधानसभा निवडणुकीत कट्टर विरोधक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल कोणाला मिळणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.