चाळीसगाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. महिलांवरील अत्याचार, चोरी, आर्थिक फसवणूक या सर्व घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केली.
काय आहे संपूर्ण घटना –
चाळीसगाव येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना काल 9 मार्च रोजी घडली. या प्रकरणी मृत महिलेच्या आईने तक्रार दिली. या तक्रारीनुसार, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 3 जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कचरू आल्हाट असे मृत महिलेच्या पतीचे नाव आहे. तो महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत आहे. तर विवाहित महिलेला पतीसह सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला. त्यामुळे या पीडित महिलेने टोकाचे पाऊल उचलले, असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, मृत विवाहित महिलेच्या आईच्या तक्रारीवरुन चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पती राहुल कचरु आल्हाट, सासू मायाबाई कचरु आल्हाट, दीर तेजस कचरु आल्हाट (सर्व रा. चाळीसगाव) यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी क्रमांक 4 ही अनोळखी महिला आरोपी असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, तसेच याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी हे करीत आहेत.
हेही वाचा – आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का?, अजितदादा काय घोषणा करणार?