बंगळुरू, 5 जून : गेल्या अठरा वर्षांपासून आयपीएलच्या जेतेपदासाठी प्रतिक्षेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलौर संघाने आयपीएलच्या 18 व्या हंगामात पंजाब किंग्जवर विजय मिळवला आणि जेतेपदावर नाव कोरले. दरम्यान, आरसीबी संघाच्या स्वागतासाठी बंगळुरूत विजयी रॅलीसह चेन्नास्वामी स्टेडियमवर स्वागत समारंभाचे काल 4 जून आयोजन करण्यात आले. मात्र, या चेन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. यामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
बंगळुरूत नेमकं घडलं? –
आरसीबीतील खेळाडुंचे बंगळुरु विमानतळावर काल 4 जून रोजी दुपारी 3 वाजता आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्याकडून टीमचे स्वागत करण्यात आले. यानंतर आरसीबी टीमच्या दोन बसेस सुरक्षेच्या वेढ्यात हॉटेल ताज वेस्ट एन्डकडे निघाल्या. यावेळी रस्त्यात देखील फॅन्सचीही मोठी गर्दी होती.
आधी कर्नाटक विधानसभेत सत्कार –
आरसीबीच्या दोन बसेस हॉटेल ताजमधून सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी कर्नाटक विधानसभेकडे रवाना झाल्या. यावेळी देखील रस्त्यावर फॅन्सची मोठी गर्दी होती. दरम्यान, कर्नाटक विधानसभेत आरसीबी टीमचा सत्कार सुरु झाला. यावेळी संपूर्ण टीमसह कर्नाटक सरकारचे प्रमुख नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे विधानसभेच्या आवारातही फॅन्सची मोठी गर्दी होती.
चेन्नास्वामी स्टेडियम बाहेर काय घडलं? –
आरसीबीच्या खेळाडूंचा स्वागत समारंभ आयोजन चिन्नास्वामी स्टेडियमवर करण्यात येत असल्याने चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर हजारोंची गर्दी जमा झाली. यावेळी स्टेडियम प्रशासन, पोलिसांचा नियोजनाचा अभाव असल्याचा दिसून आले. गर्दी वाढत असताना देखील स्टेडियमचे दरवाजे बंद ठेवले गेले. दरम्यान, सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरील गर्दीचा संयम सुटला. यावेळी स्टेडियमच्या प्रवेशद्वाराचा दरवाजा तोडून, भिंतींवरुन तसेच झाडांवरुन कारवर चढून आत जाण्याचा चाहत्यांनी प्रयत्न केला. परिणामी चेंगराचेंगरीची घटना घडली.
बाहेर चेंगराचेंगरी अन् चेन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार –
आरसीबीची टीम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दाखल झाली. यानंतर खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यास सुरूवात झाली. दरम्यान, बाहेर सुरु असलेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकारावेळी सांयकाळी 6 वाजेच्या सुमारास आतमध्ये हजारो फॅन्सच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला.
चेंगराचेंगरीच्या घटनेत 11 जणांचा मृत्यू –
चेन्नास्वामी स्टेडियमची एकूण आसनक्षमता फक्त 35,000 इतकी आहे. असे असताना तब्बल 3 लाख चाहत्यांचा गर्दीचा लोंढा स्टेडियमच्या दिशेने निघाला. परिणामी स्टेडियम बाहेरील गर्दीचा संयम सुटला. यावेळी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा देखील या अनपेक्षित गर्दीपुढे हतबल ठरले. यामुळे चेंगराचेंगरीचे घटना घडली आणि दुर्दैवाने या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 47 जण जखमी झाले.
मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत –
बंगळुरूतील दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी जनतेची माफी मागितली आहे. त्यांनी म्हटलंय की, गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने गोंधळ उडाला. यावेळी मोठी गर्दी झाल्याबद्दल मी माफी मागतो. आम्ही 5 हजारांहून अधिक कर्मचार्यांची व्यवस्था केली होती. मात्र, ‘आरसीबी’च्या चाहत्यांची ही उत्साही गर्दी असल्याने आम्ही त्यांच्यावर लाठीमार करू शकलो नाही. दरम्यान, कर्नाटक सरकारकडून मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींचा उपचाराचा खर्च सरकारच्यावतीने करण्यात येणार आहे.
हेही वाचा : धक्कादायक! दोन सख्ख्या भावांचा अपघातात जागीच मृत्यू; जळगाव शहरातील घटना