जळगाव, 12 जुलै : देशात उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ 28 टक्के आहे ते किमान 50 टक्क्यांपर्यंत पोहचण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनिष जोशी यांनी सांगितले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शनिवार दि. 12 जुलै रोजी कुलगुरू प्रा. व्ही. एल माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पुस्तक प्रकाशन व लेखक सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रा.मनीष जोशी बोलत होते.
तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली असून खुल्या वैकल्पिक पाठ्यक्रमाच्या तयार केलेल्या पुस्तकाबाबत प्रा. जोशी यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी स्वयंमचे कोर्सेस करावेत, असेही ते म्हणाले. तसेच विद्यापीठाने (AEDP) अप्रेंटिसशिप एम्बेडेड प्रोग्राम अंतर्गत केलेल्या नवीन अभ्यासक्रमाबाबत त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. नव्या शैक्षणिक धोरणात सहज उपलब्धता, समान संधी, जबाबदारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, माफक दरात शिक्षणाची व्यवस्था ही पाच उद्दिष्टे असल्याने देशातील विद्यापीठांनी या अनुषंगाने कार्य करणे गरजेचे आहे, असेही प्रा. मनिष जोशी म्हणाले. यावेळी मंचावर आग्रा येथील केंद्रीय हिंदी संस्थानचे निदेशक प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी, प्र. कुलगुरू एस टी इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते.
प्रा. सुनील कुलकर्णी बोलताना म्हणाले की, भारतीय भाषा पुस्तक परियोजना केंद्र सरकारकडून राबवली जात असून 3 लाख 96 भारतीय भाषेची पुस्तक तयार करण्यासाठी काम सुरू आहे. यात आपले विद्यापीठ (कबचौउमवि) हे एक पाऊल पुढे आहे असे सांगून मातृभाषेतून शिक्षण दिल्यास ते विद्यार्थ्यांना लगेच समजू शकते तसेच भाषा ही ज्ञान संपादनाची मर्यादा असू शकत नाही. यापुढचे शिक्षण अध्यापक केंद्रित न राहता विद्यार्थी केंद्रित असणार आहे. त्याकरिता अध्यापकांनी सज्ज असायला हवे.
अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले की, भाषेची मर्यादा कुठेही राहू नये म्हणून हे नवीन धोरण लागू करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांनी जे काम केले ते कौतुकास्पद आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे बहुआयामी धोरण आहे, त्यातला महत्वाचा आयाम म्हणजे त्या भागाचे शिक्षण त्या मातृभाषेत देणें. आणि त्यासाठी आपण अनेक प्रयत्न केले आहे. आज प्रकाशित झालेली पुस्तके ती निश्चितच विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील. या वर्षापासून 10 हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही तयार केलेली पुस्तके पोहचणार आहे.
प्रारंभी प्र. कुलगुरू प्रा. एस टी इंगळे यांनी प्रास्ताविक केले. आजच्या कार्यक्रमात विद्यापीठाने खुल्या वैकल्पिक विषयांच्या भारतीय सामाजिक समस्या, अन्न रसायनशास्त्र, सार्वजनिक आरोग्य स्वच्छता, सहकारी कायदा आणि सूक्ष्म वित्त पुरवठा भाग एक आणि भाग दोन, अन्न तंत्रज्ञान, आनंदाचे मानसशास्त्र सत्र 1 आणि कल्याणाचे मानस शास्त्र सत्र 2, गांडूळ खत निर्मिती तंत्रज्ञान, व्यवसाय सांख्यिकी, कृषी भूगोल, वनस्पती आणि रोपवाटिका व्यवस्थापन, दैनंदिन जीवनातील केमिस्ट्री, लोकसंख्या भूगोल, लेखाशास्त्राची मूलभूत तत्वे आणि आधुनिक कार्यालय व्यवस्थापन या 14 पुस्तकांचे व त्यांच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ही पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांचा देखील सन्मान करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमात पीजी डिप्लोमा इन पेटंट व्हॅल्युएशन अँड मॅनेजमेंट च्या प्रारंभाची घोषणा कुलगुरु प्रा.माहेश्वरी यांनी केली. तसेच विद्यापीठाने बौद्धिक संपदा हक्क अंतर्गत विद्यापीठाचे मंजूर झालेले पेटंटच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुस्तकांचे लेखक प्रा. शैलेश कुमार वाघ आणि प्रा. प्रभाकर महाले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्षाधिकारी प्रवीण चंदनकर तर आभार कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी मानले. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. एस. एस राजपूत, प्रा. जगदीश पाटील, व्य. प सदस्य प्रा. पवित्रा पाटील, बौद्धिक संपदा कक्षाचे समन्वयक प्रा. डी जी हुंडीवाले, प्रा. विकास गीते, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, प्रशाळांचे संचालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.