मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आज मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे. मात्र, यानंतर आपण राजीमाना का दिला, याचे स्पष्टीकरण माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. यानंतर अखेर आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
काय म्हणाले माजी मंत्री धनंजय मुंडे –
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले की, ‘बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे,’ अशी माहिती माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –
आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे. यांचा राजीनामा मी स्विकारला आहे आणि पुढील कार्यवाहीकरता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना याठिकाणी राजीनामा देऊन याठिकाणी मुक्त करण्यात आलेले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.