जळगाव, 23 जानेवारी : अन्न सुरक्षा व मानके कायदयाअंतर्गत अन्न व्यवसाय करणा-या आस्थापनांना अन्न परवाना/नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्हयातील अन्न व्यावसायिकांनी परवाना/नोंदणी घेवूनच अन्न विक्रीचा व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) सं.कृ. कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
नेमकी बातमी काय? –
विनापरवाना अन्न व्यवसाय करणे कायदयानुसार गुन्हा असून असे केल्यास 10 लाखापर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. विनापरवाना अन्न व्यवसाय करणा-यांविरुदध कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सर्व अन्न व्यावसायिकांनी परवाना/नोंदणी करावी. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांकडे असलेल्या परवान्याचे मुदतीच्या पूर्वी ऑनलाईन नूतनीकरण करुन घ्यावे. अन्यथा रुपये 6000/- इतका दंड असून मुदत संपल्यानंतर परवाना रद्द होत असून संबधित व्यवसाय विना परवाना व्यवसाय गृहित धरुन त्यांच्याविरुदध कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
अन्न परवाना व नोंदणीसाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांची https://foscos.fesai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. ज्यांची वार्षिक उलाढाल 12 लाखांच्या आत असेल अशा दुकानांनी अन्न नोंदणी करणे व ज्यांची वार्षिक उलाढाल 12 लाख किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा अन्न व्यावसायिकांनी अन्न परवानासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : जळगाव ‘ऑनर किलिंग’ प्रकरण : आरोपींवर कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदेश