ठाणे : 45 वर्षांपासून मी नागपूरच्या विमानतळावर येतो आणि जातो. मी नेहमी म्हणायचो, माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही. पण इतक्यामध्ये मी झेड प्लस असल्यामुळे कुत्रा मात्र यायला लागला, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आज सोमवारी ब्रम्हाळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध निवेदक, सुत्रसंचालक, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्ताने अमृत गौरव सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मंत्री नितीन गडकरी बोलत होते. त्यांच्या या विधानानंतर नाट्यगृहात एकच हशा पिकला.
नेमकं काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी –
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, माझा अपघात झाला होता. तेव्हा दिवंगत रतन टाटा मला भेटण्यासाठी येणार होते. परंतु त्यांना माझ्या निवासस्थानाचा पत्ता मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी मला संपर्क साधला. मी म्हणालो तुमच्या चालकाला मोबाईल द्या. तर ते म्हणाले. मीच वाहन चालवित आहे. त्यामुळे हे इतके मोठे व्यक्तिमत्त्व असून किती नम्र आणि किती शालिन होते, हे मी त्यांना जवळून पाहिले आहे. नाहीतर छोटंसं पद मिळाल्यावर लगेच पोस्ट बॅनर लावले जातात. सत्कार समारंभ होतात. गळ्यात हार टाकले जातात. आमच्या क्षेत्रात हे पटकन चाललं जातं. आम्हाला सर्व पदे टेम्पररी मिळतात. पर्मनंट नाही. पण तरी लोकं किती जोश करतात. याचा आणि नेतृत्त्वाचा काहीही संबंध नाही.
हेही वाचा – Goshta Shetkaryachi | Ep 1 | एकेकाळी पाण्याची समस्या, आज 11 विहिरी | कसं शक्य झालं| गोष्ट शेतकऱ्याची
माझ्यावर विश्वास ठेवा, मी आजपर्यंत आयुष्यात एक रुपयाही माझं पोस्टर लावायला खर्च केला नाही आणि करणारही नाही. 45 45 वर्षांपासून मी नागपूरच्या विमानतळावर येतो आणि जातो. मी नेहमी म्हणायचो, माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही. पण इतक्यामध्ये मी झेड प्लस असल्यामुळे कुत्रा मात्र यायला लागला, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर नाट्यगृहात एकच हशा पिकला.
पुढे ते म्हणाले की, मी जॉर्ज फर्नांडिस यांना पाहिलं. त्यांच्याबरोबर मला अनुभव आला. केवढा मोठा माणूस, प्रामाणिक माणूस आणि किती नम्र. त्यामुळे सुधीरचे हे वैशिष्ट्य आहे की, ज्या 4 हजार लोकांचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या मुलाखतीतून त्याने खुलवलं आहे, त्या पुस्तक रुपातून त्यांनी प्रकाशित केल्या. मात्र, जे काल आहे ते आज नाही. ते आज ते उद्या नाही. कालाय तस्मै नम:, त्यामुळे त्या मुलाखती तंत्रज्ञानाचा वापर करुन त्या पुन्हा नवीन पिढीला दाखवल्या पाहिजेत, असेही मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, या कार्यक्रमाला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.