जळगाव, 5 जून : शासन निर्णयान्वये पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2025-26 पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मृग बहार हंगामात पेरू, मोसंबी, लिंबू, सिताफळ आणि डाळींब पिकांसाठी तर आंबिया बहार हंगामात आंबा, केळी, डाळीव, पपई आणि मोसंबी पिकांसाठी हवामान धोक्यांच्या निकषानुसार विमा संरक्षण दिले जाणार आहे.
राज्यस्तरीय पिक विमा समन्वय समिती बैठकीतील निर्णयानुसार कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फॉर्मर आयडी) अनिवार्य करण्यात आला आहे. हा निर्णय 15 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने, पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2025-26 मृग व आंबिया बहाराकरिता सहभागी होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फॉर्मर आयडी) असणे बंधनकारक आहे.
दरम्यान, शेतकरी ओळखपत्र क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत विम्याचा लाभ दिला जाणार नाही, अशी माहिती देत सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर अॅग्रीस्टॅक प्रणालीत शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळवून घ्यावा व फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान मुराद तडवी यांनी केले आहे.