चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
इगतपुरी (नाशिक), 6 जून : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे काल गुरूवार 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.
समृद्धी महामार्गाची संकल्पना –
राज्यात 2014 साली सत्तेत आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने 2015 साली समृद्धी महामार्गाची घोषणा केली. यानंतर 2018 मध्ये या महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. मुंबई ते नागपूर प्रवासाला 16-18 तास लागायचे. यामुळे हे अंतर कमी करून 8-9 तासांवर हा प्रवासाठी वेळ लागला पाहिजे. तसेच विकसनशील जिल्ह्यांना महानगरांशी जोडणे, वाहतुकीची सोय, अपघातांमध्ये घट आणि पर्यावरणपूरक रचना इत्यादी मुद्यांना केंद्रस्थानी ठेवत समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडण्यात आली.
समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव –
मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गाला “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग” नाव देण्यात आले. या नावाची अधिकृत घोषणा 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यात करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरे यांचा राज्यावर मोठा प्रभाव होता. त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून समृद्धी महामार्गाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गचे चार टप्पात उद्घाटन –
समृद्धी महामार्ग (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) हा 701 किमी लांबीचा नागपूर ते मुंबई दरम्यानचा महत्त्वाकांक्षी एक्सप्रेस हायवे आहे. या महामार्गाचे उद्घाटन चार टप्प्यांमध्ये करण्यात आले आहे.
पहिला टप्पा – नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किमी अंतराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते करण्यात आले. हा टप्पा नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधून जातो.
दुसरा टप्पा – शिर्डी ते भरवीर खुर्द दरम्यान 80 किमी अंतराच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 26 मे 2023 रोजी करण्यात आले. या टप्प्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागांना जोडतो.
तिसरा टप्पा – भरवीर खुर्द ते इगतपुरी दरम्यान 25 किमी अंतराच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्र्यांच्या हस्ते 4 मार्च 2024 करण्यात आले. या टप्प्यात कासारा घाटातील 7.8 किमी लांबीचा देशातील सर्वात मोठा रस्ता बोगद्याचा समावेश आहे.
चौथा टप्पा – इगतपुरी ते अमाणे (ठाणे) दरम्यान 76 किमी अंतराच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांच्या हस्ते काल गुरूवार 5 जून 2025 रोजी करण्यात आले.
दरम्यान, या चार टप्प्यांच्या उद्घाटनामुळे संपूर्ण 701 किमी महामार्ग पूर्ण झाला असून नागपूर ते मुंबई प्रवासाचा कालावधी 16 तासांवरून 8 तासांपर्यंत कमी झाला आहे.
समृद्धी महामार्गाचे वैशिष्ट्ये आणि खर्च –
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ही 701 किमी इतकी आहे. समृद्धी महामार्गावर देशातील सर्वात लांब बोगदा असून तो 8 किमी अंतराचा आहे. यासोबतच या महामार्गावर 32 मोठे पूल, 25 इंटरचेंज, 6 किमी ओव्हरपास आहेत. तसेच महामार्गालगत 3 आंतरराष्ट्रीय आणि 7 डोमेस्टीक विमानतळे आहेत. सीसीटीव्ही, फायर अलार्म, स्प्रिंकलर सिस्टीम अशा उच्च सुरक्षा प्रणालींचा वापर महामार्गासाठी करण्यात आला आहे. तसेच महामार्गाची 120 किमी/तास वेगाने प्रवासाची क्षमता आहे. या महामार्गाच्या बाजूला 11.5 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गासाठी 55 हजार 500 कोटींचा खर्च अपेक्षित होता. अखेरीस महामार्गाच्या पुर्तेसाठी 61 हजार 000 कोटी रूपयांचा खर्च लागला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
समृद्धी महामार्गाचा कोणत्या जिल्ह्यांना लाभ होणार –
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा थेट 10 जिल्ह्यांना लाभ होणार आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. यासोबतच या महामार्गाचा अप्रत्यक्षपणे 10 जिल्ह्यांना लाभ होणार आहे. यामध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
समृद्धी महामार्गाचे फायदे –
समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवासाचा वेळ 16 तासांवरून 8 तासांवर आला आहे. औद्योगिक विकास, शेती उत्पादनाचा व्यापार, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स यासारख्या घटकांना चालना मिळणार असून ज्यामुळे रोजगाराच्या संधी देखील वाढणार आहेत. यासोबतच महामार्गावर 3.3 दशलक्ष वृक्ष लागवड, सौरऊर्जा प्रकल्प (200 मेगावॅटपासून सुरूवात), आणि गॅस पाइपलाइन यांसारखे पर्यावरणपूरक उपाय केल्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी हे महत्वपुर्ण ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल. तसेच आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे.”
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
“समृद्धी महामार्गामुळे वेळ, प्रदूषण आणि इंधनाची बचत होणार आहे. या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरण पूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल. समृद्धी महामार्ग नाशिकसह मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागासाठी लाभदायक ठरेल, त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल. या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. वाहन चालवतांना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे. ”
– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले? –
“समृद्धी महामार्गासारख्या नवीन प्रकल्पांमुळे प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचेल, इंधन बचत होईल, प्रवास वेगवान होईल. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरणास चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल. तसेच समृद्धी महामार्गानंतर आता राज्यातील अन्य प्रकल्पांनाही गती देण्यात येईल.”
– उपमुख्यमंत्री अजित पवार