मुंबई, 8 फेब्रुवारी: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा थरार 7 फेब्रवारीपासून सुरू झाला असून, उद्घाटन सामन्यातच टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकन संघाला निर्धारित 20 षटकांत 132 धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारतीय संघाची अडखळती सुरुवात –
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. त्यानंतर, ईशान किशन आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात शॅडली वान शल्कविकने सलग फटकेबाजी मोडीत काढत ईशान किशन (20), तिलक वर्मा (25) आणि शिवम दुबे (0) यांना बाद केले. त्या टप्प्यावर भारताची धावसंख्या 46/4 अशी होती.
सुर्याने सावरला भारताचा डाव –
यानंतर रिंकू सिंग (6) आणि हार्दिक पंड्या यांनाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. हार्दिक पंड्या बाद झाला तेव्हा भारताचा स्कोअर 77/6 असा झाला होता. अशा कठीण परिस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी सातव्या विकेटसाठी 41 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला सावरले. अक्षर पटेल 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत 49 चेंडूत नाबाद 84 धावांची वादळी खेळी करत भारताचा डाव सावरला.
या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार ठोकले. भारताने अखेर 9 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. अमेरिकेकडून शॅडली वान शल्कविकने 25 धावांत 4 विकेट्स घेतल्या, तर हरमीत सिंगला दोन बळी मिळाले.
…अन् अमेरिकेचा पराभव –
लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकन संघाची सुरुवातही निराशाजनक ठरली. पॉवरप्लेमध्येच तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यानंतर मिलिंद कुमार आणि संजय कृष्णमूर्ती यांनी चौथ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी करत संघाला आशा निर्माण करून दिली. मिलिंद कुमारने 34, तर संजय कृष्णमूर्तीने 37 धावा केल्या. मात्र, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्या फिरकीपुढे अमेरिकन फलंदाज टिकू शकले नाहीत. अक्षर पटेलने सलग चेंडूंवर दोन विकेट्स घेत सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. अखेर अमेरिकेचा डाव 132 धावांवर आटोपला आणि भारताने सामना 29 धावांनी जिंकला.
हेही वाचा : आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






