संगमनेर (अहिल्यानगर), 14 फेब्रवारी : संगमनेर तालुक्यात महायुती सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा बांधकाम कामगारांना लाभ देण्यात येत आहे. ही सर्व प्रक्रिया विनामूल्य राबविण्यात येत असून बांधकाम कामगारांनी कोणत्याही एजंटांना पैसे न देता थेट महायुती जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज भरून लाभ घ्यावा, असे आवाहन संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले.
बांधकाम कामगारांनी एजंटांना बळी पडू नका – अमोल खताळ
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वाटप करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचे फॉर्म भरण्यासाठी काही ठिकाणी एजंटांकडून पैसे घेतले जात असून फसवणूक केल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारांना बळी न पडता नागरिकांनी आमदार अमोल खताळ पाटील जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून एक रुपयाही न देता योजनांचे अर्ज भरावेत, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. कोणी पैसे मागत असल्यास किंवा अडवणूक करत असल्यास गुप्तपणे माहिती द्यावी संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी आ. खताळ यांनी दिला.
केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार असून संगमनेरात शिवसेनेचा आमदार असल्यामुळे विकासकामांमध्ये कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सांगत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुती सरकारच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचे आवाहन आमदार खताळ यांनी उपस्थितांना केले. तसेच महायुती सरकाराच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांचा लाभ देऊन सशक्त समाज निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्नशील असल्याचा विश्वास आमदार खताळ यांनी यावेळी व्यक्त केला.
संगमनेर शहरातील मातोश्री लॉन्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शनिवार (१४ फेब्रुवारी) रोजी दोन हजार बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच देण्यात आले. तसेच यापुर्वी एकूण तेरा हजार बांधकाम कामगारांना आमदार अमोल खताळ यांच्या सहकार्याने संगमनेर येथे गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय विविध बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील ६१४४ लाभाचे प्रस्ताव अर्ज मंजूर करून ६ कोटी ३५ लाख ४ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
– शैक्षणिक योजनेतून ५८४१ लाभार्थींना ५ कोटी ७२ लाख २७ हजार रुपये
– आरोग्य योजनेत १९ लाभार्थींना ६ लाख ७२ हजार रुपये
– सामाजिक योजनेत १२४ प्रकरणांमध्ये २९ लाख २५ हजार रुपये
– अर्थसहाय्य योजनेत ६० लाभार्थींना ३० लाख ३२ हजार रुपये
गृहपयोगी वस्तू संच वाटप कार्यक्रमाला व्यासपीठावर बांधकाम अधिकारी सौरभ हामंद, उदय सूर्यवंशी, प्रकाश भोसले शेतकरी नेते संतोष रोहम, ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठलराव घोरपडे, तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, राजेंद्र सोनवणे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, गोकुळ दिघे, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे नगरसेविका, साक्षी सूर्यवंशी, निमोण सरपंच संदीप देशमुख, पायल ताजने, तालुका अध्यक्ष कविता पाटील, संगीता पुंड, सपना जाधव, दिपाली वाव्हळ, अश्विनी कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : चोपडा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच्च्या केळ्यांपासून साकारलं 18 फूट उंच भव्य ‘महाशिवलिंग’






