मुंबई, 30 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला जायचे आणि अमित शाह यांना भेटायचे, असे राऊत म्हणाले. आज सकाळी पत्रकारांसोबत ते बोलत होते.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले? –
पत्रकारांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नाट्यकलेविषयी पत्रकारांना माहिती दिली. अजित पवार हे किमान 10 ते 12 वेळा दिल्लीतून वेश बदलून आले. फक्त वेश बदलून नाही तर ते चक्क बनावट नाव वापरून आले. आता कोणी म्हणते ते एपी अनंत या नावाने आले. तर कोणी म्हणते ते ए. पवार नावाने आले. त्यांनी मिशा लावल्या होत्य… टोप्या घातल्या होत्या, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. विष्णुदास भावे यांनी रंगभूमीची स्थापना केली होती. मात्र, त्यानंतर हे नवीन बारामतीचे विष्णुदास भावे निर्माण झाले आहेत”, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली.
संजय राऊत यांचा मोठा दावा –
माझ्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याआधी वेश बदलून भेटत होते. एकनाथ शिंदे हे जेव्हा-जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेले होते. एकनाथ शिंदे हे नाव बदलून मौलवीच्या वेशात दिल्लीला गेले असल्याची माहिती देखील माझ्याकडे आहे. तेव्हा ते अमित शाह यांना भेटायचे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे नाव बदलून आणि वेश बदलून गृहमंत्री अमित शाह यांना भेटतात, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय.
दरम्यान, अशापद्धतीने ते जात असताना देखील त्यांना कोणीही विमानतळावर अडवत नाही. याचाच अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनावलेले आहे. कारण तसे त्यांना विमानतळावरून सोडणार नाहीत. त्यामुळे त्यांनी वापरलेले बोर्डींग तपासले पाहिजे. तसेच त्यांच्याकडून हे ओळखपत्र जप्त केली पाहिजे, असेही राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, प्रश्न हा आहे की, विमानतळाची सुरक्षा किती खोकली झाली आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे. कोणताही माणूस बनावट नावाने, वेश बदलून आपल्या स्वार्थासाठी दिल्ली आणि मुंबई सारख्या विमानतळावरून प्रवास करु शकतो, हे त्यातून दिसून येत आहे. एवढेच नाही तर तो व्यक्ती देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो. याचाच अर्थ देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ झाला आहे. यामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री यांचाही सहभागी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा : दुःखद! धुळ्यात भरधाव ट्रकने कारला चिरडले, तरुण पत्रकाराचा अपघातात मृत्यू