मुंबई, 30 जानेवारी : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जातेय. दरम्यान, मंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला राजीनामा देण्याचे निर्देश दिल्यास मी पद सोडेन, असे ते म्हणाले आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड याचे नाव घेतले जात आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या जवळीकीमुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे हे राज्यातील महायुती सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठामंत्री असून विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच मंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मला राजीनामा देण्याचे निर्देश दिल्यास मी पद सोडेन, असे मुंडे यांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धक्कादायक खुलासे समोर आणले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणातील या गुन्ह्यात मुंडे यांच्याविरोधात माझ्याकडे ठोस पुरावे असून, मी ते अजित पवार यांच्याकडे सोपवले आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे.