अहिल्यानगर, 13 फेब्रुवारी: देशात आजही अनेक ठिकाणी जाती-पातीचं राजकारण आणि भेदभाव पाहायला मिळतो. जातीचा अभिमान बाळगण्याची आणि त्यादृष्टीने कृत्ये केल्याची उदाहरणे अनेकदा समोर येतात. यात ऑनर किलिंग, सामाजिक बहिष्काराच्या घटनाही घडतात. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं सौंदाळा हे गाव ‘जातमुक्त गाव’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तसा ठराव विशेष ग्रामसभेत मंजूर करण्यात आला असून रक्तदान शिबीर घेऊन त्यानंतर जातमुक्तीचा ठराव घेण्यात आला.
काय आहे संपुर्ण बातमी? –
नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावात जात, धर्म, पंथ किंवा वंशाच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही आणि सर्व रहिवाशांना समान वागणूक दिली जाईल. “गावकऱ्यांनी एकत्रितपणे ‘माझी जात – मानव’ ही भावना स्वीकारण्याचा संकल्प केला. सरकारी सेवा, जलस्रोत, मंदिरे, स्मशानभूमी, शाळा आणि सामाजिक कार्यक्रमांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे आणि सुविधा सर्व रहिवाशांसाठी भेदभाव न करता खुल्या राहतील,” असे ठरावात म्हटले आहे.
ग्रामसभेने असाही ठराव केला की कोणताही ग्रामस्थ अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कार किंवा सामाजिक अन्याय घडवून आणणारा कोणताही मजकूर पोस्ट किंवा प्रचार करणार नाही आणि उल्लंघन झाल्यास आवश्यक ती कारवाई केली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय.
या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंझाडे यांनी दिलेल्या मार्गदर्शन आणि प्रेरणाची कदर करणारा हा ठराव शरद बाबुराव अरगडे यांनी मांडला आणि बाबासाहेब मच्छिंद्र बोधक यांनी त्याला अनुमोदन दिले. तो राज्य सरकारकडे नोंदीसाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे.
‘जात मुक्त गाव’चा निर्णय –
सौंदाळा गावची लोकसंख्या २५०० एवढी आहे. शेती हा इथल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. सौंदाळा गाव हे कायमच समाजहिताचे, प्रगत आणि प्रेरणादायी निर्णय घेणारे गाव म्हणून ओळखले जाते. याआधी शिवीगाळ बंदी, विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध योजना तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे ठराव सौंदाळा ग्रामपंचायतीमार्फत मंजूर करण्यात आले आहेत. एकीकडे जातीय तेढ वाढत असताना, आता सौंदाळा गावाने घेतलेला ‘जात मुक्त गाव’चा हा निर्णय महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
हेही वाचा : Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन






