सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 21 मे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. यादरम्यान संपूर्ण देश भारतीय सैन्याच्या पाठीशी उभा होता. यानंतर ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेकडुन राज्यभरात तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज पारोळ्यात अमोलदादा पाटील मित्र मंडळातर्फे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.
आपल्या माणसांना गमावल्याचे दुःख, भिकारड्या पाकड्याचा राग आणि दहशतवादी ठेचल्याचा आनंद अशा संमिश्र भावना व्यक्त करत या यात्रेत एरंडोल विधानसभा मतदारसंघातील मेडीकल असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघ, दुर्गा शौर्य पथक, रिक्षा युनियन, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, मराठा सेवा, टुर्स & ट्रॕव्हल्स युनियन यांचेसह विविध संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, महिला बचत गट, महिला आघाडी, महिला संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
या तिरंगा यात्रेला पारोळा शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन व माल्यार्पण करत सुरूवात करण्यात आली. शहरातील व्हरायटी कॉर्नर वरून सरळ बाजार पेठेने – नगरपालिका चौक – गावहोळी चौक – रथ चौक – श्री मोठे श्रीराम मंदिर चौक – भवानी चौक – आझाद चौक – मडक्या मारोती चौक – मोठा महादेव चौक – तलाव गल्लीने सरळ राणी लक्ष्मीबाई प्रवेशव्दार व तेथुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला अभिवादन करत या तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला.
या तिरंगा यात्रेत सपत्नीक भारत मातेचा प्रतिमेचे व राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे पुजन करत रॅली मार्गस्थ केली. या तिरंगा यात्रे दरम्यान चारचाकी वाहनावर भारतमातेचा जिवंत देखावा मुख्य आकर्षण होता. तसेच भारतीय सैन्य दलाचा पोषाख परिधान केलेले सैनिकांचा देखील बोलका देखावा मुख्य आकर्षक ठरला. या यात्रेवेळी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.