मुंबई : महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातून गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि संजय सावकरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. यामध्ये खातेवाटपात गुलाबराव पाटील यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग देण्यात आला. आपल्या या विभागाचा पदभार कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रालयातील दालनात पदभार स्विकारला.
पदभार स्विकारल्यावर मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले –
मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयातील दालनात आज आपल्या विभागाचा पदभार स्विकारला. यावेळी पाणीपुरवठा विभागातील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देत ग्रामीण भागातील जनतेला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील कामांना गती देणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, या विभागाच्या योजना यापूर्वीही प्रभावीपणे राबविण्यात आल्या असून प्रगतीपथावरील योजनांसाठी आवश्यक निधी वितरित करण्यात येईल. पाण्याची कमतरता भासू नये यासाठी तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन विविध कामांना गती देणार आहे. विभागाच्या माध्यमातून पाण्याची मूलभूत गरज पूर्ण करणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.