जळगाव – गेल्या काही दिवसात आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच लाचखोरीच्या घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तलाठीने 3 हजारांची लाच मागितली. याप्रकरणी कुसुंबा येथे तलाठीला अटक करण्यात आली.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. नितीन शेषराव भोई असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील तक्रारदार यांनी त्यांच्या आई व भावाचे नाव सात-बारा उतारा व स्लॅब रजिस्टरवर लावण्यासाठी अर्ज केला होता. या कामासाठी तलाठी नितीन भोई यांनी त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी याबाबत जळगाव लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीनुसार लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यात तीन हजार रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानंतर लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा रचण्यात आला. तलाठ्याने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, चालक सुरेश पाटील, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी सापळा रचत ही कार्यवाही केली.
VIDEO : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive