ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 16 ऑगस्ट: भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पर्वानिमित्त पाचोरा परिसरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन करण्यासाठी शिवसेना-युवा सेना, पाचोरा-भडगाव यांच्या वतीने पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात स्वातंत्र्यसैनिक कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पाचोरा तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले, पोलीस उपअधीक्षक बापू रोहम, तहसीलदार विजय बनसोडे आणि पोलीस निरीक्षक राहुल पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील, पाचोरा नगरपालिकेच्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, विनोद तावडे, सुमित सावंत, भोला पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, समन्वयक गजू पाटील, माजी नगरसेवक रविभाऊ पाटील, राजेश पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी आपल्या घरातील व्यक्ती देशासाठी समर्पित केली, त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचाही त्याग तितकाच मोठा आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन सक्षम, समृद्ध, स्वाभिमानी आणि विकसित राष्ट्र घडविण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
पाचोरा-भडगाव परिसरातून भारतीय सैन्य दलात मोठ्या संख्येने युवक कार्यरत असल्याचा अभिमान व्यक्त करत आमदार पाटील यांनी पाचोरा येथील हुतात्मा स्मारकाचे लवकरच व्यापक स्वरूपात सुशोभीकरण व विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला. स्वातंत्र्यसंग्रामात तालुक्यात हुतात्मा झालेल्या, ब्रिटिश सत्तेविरोधात लढताना जखमी झालेल्या तसेच कारावास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती माहितीपट व भित्तीपटाच्या माध्यमातून जतन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच पाचोरा तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानावर पुस्तक प्रकाशित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या माध्यमातून तालुक्याचा स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचून तरुणांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
करिअर मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी पाचोरा तालुक्याचा स्वातंत्र्यपूर्व इतिहास तसेच स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान यावर प्रकाश टाकला. युवकांनी देशाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून शिक्षण, कौशल्य, विज्ञान-तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान द्यावे. हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस उपअधीक्षक बापू रोहम यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व सांगतानाच रस्ता सुरक्षितता आणि स्वयंशिस्तीचे महत्त्व स्पष्ट केले. तहसीलदार विजय बनसोडे यांनी राष्ट्राच्या प्रगतीमध्ये प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत भारतीय हीच आपली खरी ओळख आहे, असे प्रतिपादन केले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांच्या वतीने पत्रकार संदीप दामोदर महाजन यांनी आमदार किशोर आप्पा पाटील व शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या कृतज्ञता सन्मानाबद्दल आभार मानले. त्यांनी पाचोरा शहरातील स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाला उजाळा देत चले जाव आंदोलनाच्या काळात स्वर्गीय सुपडू अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाच्या आठवणी सांगितल्या.
या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान –
स्वर्गीय सुपडू भादू पाटील (पाचोरा येथील ऑगस्ट क्रांतीचे नेतृत्व), हुतात्मा स्व. महादू चिंधा माळी, हुतात्मा स्व. छगन राजाराम लोहार, स्व. नथू महादू पाटील, स्व. लाभचंद जगजीवन राम शेठ, स्व. बाजीराव धुरसिंग पाटील, स्व. श्रीपत दलचंद तेली, स्व. बळीराम शिवराम शिंपी, स्व. बळीराम वेडू पाटील, स्व. रामचंद्र खंडू जोशी, स्व. महादेव लाला पाटील, स्व. लोटन सोनजी पाटील, स्व. कपूरचंद मुथा, स्व. उखर्डू मल्हारी पाटील, स्व. जनार्दन बळवंत वाणी, स्व. दामोदर लोटन महाजन, स्व. सांडू गुलाबसिंग राजपूत, स्व. राजाराम धनजी पाटील, स्व. चंपकलाल रविशंकर मोदी, स्व. महादू मोतीराम परदेशी, पै. रोज महंमद शालम पठाण, स्व. केशव पांडू शिंदे, स्व. नागोशेट बारकू सोनार आणि स्व. अमृत देवराम पाटील यांच्या कुटुंबीयांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश पाटील यांनी केले. कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






