मुंबई, 10 जानेवारी : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. असे असताना सरकारच्या कामांमध्ये गती असावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रशासनाला महत्वाच्या सूचना केल्या जात आहेत. अशातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2019 च्या वर्षाच्या संदर्भ देत महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत सकाळ समूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या दहा वर्षांत 2019 हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्र वेगाने पुढे गेला असता. 2019 ते 2024 या कालावधीत महाराष्ट्रात काय काय घडले हे मी वेगळे सांगायची आवश्यकता नाही. पण, त्यामुळे विकासाची गती होती तिला खिळ बसली होती. मात्र, 2022 नंतर आपण पुन्हा विकासाला गती दिली आहे. दरम्यान, आता दाव्याने हे सांगतो आहे की, महाराष्ट्राला कुणी थांबवू शकणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
अनेक आव्हानांचा सामना केला –
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, एक व्यक्ती म्हणूनही अनेक आव्हानांचा सामना केला आहे की त्यातून आता परिपक्वता आली आहे. आता मला आव्हानांची चिंता वाटत नाही किंवा मल्टिटास्किंग म्हणतो तशी आव्हाने पेलत असताना, आपला अजेंडा ढळू द्यायचा नाही. आपल्या अजेंड्यावर आपण चालत राहायचे असा माझा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, मागच्या दहा वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय म्हणतात तसे झाले असल्याचेही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले पुढे म्हणाले की, आम्ही गतीशिलता आणि पारदर्शी कारभार या दोन्हीचा समावेश आमच्या प्रशासनात आहे. राज्यकर्त्यांनी प्रशासन योग्य पद्धतीने चालवायचे असते. मागच्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीचे प्रशासन बदलून टाकले. दिल्लीचे राजकारण म्हणजे ठगांचे तसेच दलालांचे राजकारण आहे असे म्हटले जायचे. मात्र, आता तिथे ठगही सापडत नाहीत आणि दलालही सापडत नाहीत.