चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
परधाडे (पाचोरा), 22 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते माहिजी स्टेशन दरम्यान असणाऱ्या परधाडेजवळ भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार 22 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या रेल्वे अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून इतर जखमींवर जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
पाचोरा ते माहिजी स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं? –
पाचोरा ते माहिजी स्थानकामधील परधाडे स्थानकाच्यामागे असलेल्या वडगाव या गावाजवळ लखनौऊ ते मुंबई जाणारी पुष्पक एक्सप्रेसमधील जनरल डब्यातील काही प्रवाशांना धूर दिसल्याने त्यांनी डब्याला आगा लागल्याचा संशय व्यक्त केला. अशातच प्रवासी घाबरले असतानाच डब्यातील कोणतरी चैन खेचल्याने ट्रेन थांबवली. यानंतर ट्रेन थांबली असता प्रवाशांनी ट्रेनमधून आजूबाजूने उड्या मारल्या.
…अन् वळणामुळे ट्रेन दिसली नाही –
पुष्पक एक्सप्रेसमधून डब्याला आग लागल्याच्या भीतीने उड्या मारलेले प्रवासी हे विरूद्ध दिशेच्या रूळावर होते. अशातच मुंबईच्या मार्गाने बंगळुरु-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस भरधाव वेगात आली. दरम्यान, त्या एक्स्प्रेसने रुळांवरील प्रवाशांना चिरडले. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. तर काही प्रवासी जखमी झाले. कर्नाटक एक्सप्रेस ज्या दिशेने येत होती. त्या दिशेने वळण असल्याने ही एक्सप्रेस प्रवाशांना दिसली नाही आणि अशातच त्यांचा ट्रेन खाली येऊन दुर्दैवीपणे मृत्यू झाला.
प्रशासनाने तत्काळ राबवले मदतकार्य –
रेल्वे अपघाताची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळताच त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहचवली. दरमान, मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यांच्यासह जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. यानंतर रेल्वे पोलीस, पाचोरा पोलीस, स्थानिक प्रशासन तसेच परिसरातील गावाकऱ्यांच्यावतीने मदतकार्य राबविण्यात आले. यामध्ये जखमींना तत्काळ रूग्णवाहिकेद्वारे पाचोरा तसेच जळगावच्या रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे.
जळगाव रेल दुर्घटनेत मयत झालेल्या पैकी सहा जणांची ओळख पटली असून ती नावे खालील प्रमाणे आहेत.
- लच्छीराम पासी, वय-40 वर्षे
- कमला नवीन भंडारी, वय-42 वर्षे
- बाबू खान, वय-27 वर्षे
- हिनु नंदराम विश्वकर्मा, वय-9 वर्षे
- नोकला भट्टू, जयवाडी, वय- 60 वर्षे
- नसुरुद्दीन बहुद्दीन सिद्धिक, वय-18 वर्षे
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावौस दौऱ्यावर आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी रेल्वे अपघातबाबत शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री फडणवीसांनी तत्काळ मृताच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली. तसेच जखमींचा संपुर्ण उपचाराचा खर्च सरकारच्यावतीने करण्यात येईल, असे सांगितले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया –
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या दुर्दैवी घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून प्रशासनाला सर्वोतोपरी मदत पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. घटनास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, मृत व जखमी प्रवाशांची माहिती मिळवण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याबाबत योग्य ती चर्चा देखील सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकार व रेल्वे विभागाच्या संपर्कात जिल्हा प्रशासन घटनेच्या अनुषंगाने रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया –
मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर रूग्णालयात दाखल केलेल्या जखमींची प्रत्यक्ष विचारपूस करून तब्येतीची विचारणा केली. यानंतर मंत्री महाजन माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी आग लागल्याच्या भीतीतून 20 ते 25 जणांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. अशातच समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत होती. दरम्यान, त्यांना त्या ट्रेनचा अंदाज न आल्याने ते लोकं ट्रेनखाली अतिशय दुर्दैवीपणे चिरडले गेले. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय तर 12 ते 15 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रतिक्रिया –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रेल्वे अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, अपघातातील सहा ते सात प्रवासी आहेत त्यांना बंगळुरु कर्नाटक एक्सप्रेसने चिरडलं. या दुर्घटनेच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु केले. जखमींना आम्ही तातडीने ग्रामीण रुग्णालयासह एकूण तीन रुग्णालयांमध्ये दाखल केले असल्याची माहिती प्रसाद यांनी दिली. या अपघातात एकूण 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये 9 पुरूष तर 3 महिलांचा समावेश आहे. तसेच जखमी असलेल्या रूग्णांवर उपचार सुरू असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रांताधिकारी भूषण अहिरे यांची प्रतिक्रिया –
परधाडे स्थानकाजवळ साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान रेल्वे अपघाताची घटना समोर आली. पुष्पक एक्सप्रेसमधील डी-3 या जनरल डब्यात काही आग लागल्याची अफवा पसरली. या जनरल डब्यात जास्त गर्दी होती आणि अशातच काही लोकं या डब्यातून बाहेर पडले. परंतु, ट्रेनमधून बाहेर पडल्यानंतर समोरील दिशेने कर्नाटक एक्सप्रेस येत होती. अत्यंत वेगाने येणारी ही जलद एक्सप्रेस होती आणि या जलद एक्सप्रेसखाली आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला. तर 10 ते 12 जखमींना रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पाचोरा-भडगावचे प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी दिली.
हेही पाहा : pachora railway accident : पाचोरा भीषण रेल्वे अपघात, घटनास्थळावरुन आढावा…