जळगाव, 13 जून: जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरील बंडखोरीचा पेच अखेर मिटला आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी मागे घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर पडदा पडला असून भाजप आणि महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट –
रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सुरुवातीला कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली होती. मात्र, काल शुक्रवारी मुंबई येथे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पक्षादेशाचे पालन करत निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.
दरम्यान, माघारीच्या निर्णयापूर्वी रेश्मा काळे काही तास ‘नॉट रिचेबल’ झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. त्या जळगावबाहेर गेल्याच्या तसेच देवदर्शनासाठी रवाना झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह महायुतीतील वरिष्ठ नेतेही बंडखोरी शांत करण्यासाठी प्रयत्नशील होते. अखेर मुंबईतील बैठकीनंतर या सर्व चर्चांवर पूर्णविराम मिळाला.
प्रचार थांबवत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा –
माघारीची घोषणा करताना रेश्मा काळे म्हणाल्या, “मी आमचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली. त्यांच्या आदेशाचे पालन करून मी महायुतीला पाठिंबा देत आहे. आजपासून माझा सर्व प्रचार थांबवत आहे.”
नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर महायुतीचे लक्ष जळगावच्या निवडणुकीकडे लागले होते. रेश्मा काळे यांच्या माघारीमुळे महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोरच्या अडचणी कमी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शरद तायडे तसेच अपक्ष उमेदवार अनिल चौधरी हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार असून आता निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान






