नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला असून तब्बल 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळविण्यात यश प्राप्त झालंय. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या निकालाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पॅटर्न राबविला गेलाय, ज्याचा परिणाम आजच्या निकालात दिसतोय. अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलीय. तो काहीकाळ चालेल अन् कालांतराने तो इतिहास जमा होईल, असेही राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत यांची निकालावर प्रतिक्रिया –
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस नेहमीप्रमाणे वेगळे लढले. पण यावेळेला शत्रू अधिक ताकतीने लढतोय, याचे भान ठेवले असते आणि आमच्या इंडिया आघाडीतील दोन प्रमुख पक्ष एकत्र आले असते तर निश्चित आजचा निकाल वेगळा दिसला असता. काँग्रेस आणि आपने या संकट काळात एकत्र यायला पाहिजे होते, अशी आमचीही भूमिका होती. खरंतर, हरियाणात दोघे एकत्र आले नाही. त्यामुळे त्याचा फायदा भाजपला झाला. आणि दिल्लीतही तेच घडले, असे आजच्या निकालातून दिसतंय. दरम्यान, भाजप आणि आपमधील निकालाचे अंतर जास्त नसल्याचेही राऊत म्हणाले आहेत.
‘आता निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न!’ –
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत बोलताना, दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न राबविला गेला असल्याचे मी कालच सांगितले होते. एकेकाळी महाराष्ट्रात एसएससी बोर्डात लातूर पॅटर्न होतात. लातूरची विद्यार्थी महाराष्ट्रात अव्वल येत होती.
आता लातूर पॅटर्न कुठे आहे? खरंतर, आता निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्र पॅटर्न केला आहे. मात्र, ज्याप्रमाणे लातूर पॅटर्न संपला अगदी त्याचप्रमाणे भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न काहीकाळ चालेल अन् कालांतराने तो इतिहास जमा होईल, असेही राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, राजकारणात अघोरी प्रयोग केले जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय.
राजकारणात ‘महाराष्ट्र पॅटर्न’ यासारखे असे अघोरी प्रयोग केले जातात. मात्र, यावेळी संयमाने काम करण्याची गरज असते. आम्हालासुद्धा आता त्याचे जे मार्ग आहेत..त्याचा अभ्यास करावा लागेल आणि कार्यकर्त्यांना आता त्याबाबत मार्गदर्शन करावे लागेल. दरम्यान, भाजप हे कामाच्या बळावर निवडणूक जिंकत नाही. तर लोकांना धर्माची अफूची गोळी द्यायची आणि आपल्यासाठी मते मिळवून घ्यायची, असा त्यांचा प्रयत्न असतो, अशी टीकाही संजय राऊत यांनी भाजपवर केलीय.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत: