मुंबई, 9 मार्च: राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून आवश्यकतेनुसार इतर अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविणे तसेच तात्पुरत्या स्वरूपात बाह्य यंत्रणेकडून काम करून घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन ती तातडीने भरावीत तसेच स्थानिक बेरोजगार युवकांना संधी देण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा, अशी मागणी विधानसभा सदस्य सुलभा गायकवाड यांनी लक्षवेधीद्वारे केली होती. या चर्चेत अभिजित पाटील आणि प्रवीण दटके, स्नेहा दुबे यांनीही सहभाग घेतला.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, गट ‘क’ (श्रेणी अ, ब, क) संवर्गातील ५,९२७ मंजूर पदांपैकी २,३०८ पदे रिक्त आहेत. तसेच गट ‘क’, ‘ड’ व सफाई कामगारांची सुमारे ६,१२७ पदे रिक्त आहेत. ही पदभरती सरळसेवेने भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा प्रक्रियेच्या अनुषंगाने टीसीएस आणि आयबीपीएस या संस्थांसोबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पत्रव्यवहार चालू आहे.
ठाणे महानगरपालिकेत १,७७३ पदांसाठी जाहिरात देण्यात आली असून त्यापैकी ४९० पदांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मुंबई महानगरपालिकेत २,६७३ पदांसाठी जाहिरात देण्यात आली असून त्यापैकी १,१७९ पदे भरली असून १,४३५ पदांची प्रक्रिया सुरू आहे.
सध्या २० महानगरपालिकांमध्ये पदभरतीची प्रक्रिया सुरू असून उर्वरित महानगरपालिकांसाठीही ती प्रस्तावित आहे. तसेच नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी आरक्षण निश्चितीसाठी बिंदू नियमावली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.






