मुंबई, 13 मार्च: राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन –
रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
देशातील बहुतांश भागात सध्या तीव्र उष्णतेची लाट असली तरी काही ठिकाणी हवामानात बदलाची चिन्हे दिसू लागली आहेत. पुढील काही दिवसांत उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून काही भागांत पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत पुढील दोन ते तीन दिवसांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच काही ठिकाणी जोरदार वारेही वाहण्याचा अंदाज आहे.
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये १७ मार्चपर्यंत बर्फवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यामुळं पहाडी भागातील तापमानात घट होऊन थंडी वाढू शकते. दरम्यान, पश्चिम भारतात मात्र उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असून सौराष्ट्र-कच्छ भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा परिणाम सुरूच राहील. गुजरातमध्येही तापमान उच्च पातळीवर जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.






