ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी (ता. पाचोरा), 5 जुलै: वारकरी परंपरा आणि गोसेवेचा अनोखा संगम घडवत सातगाव डोंगरी येथून प्रथमच आयोजित करण्यात आलेली ‘निर्लोभ पायी दिंडी’ शुक्रवारी मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे रवाना झाली. या दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे दिंडीसोबत देशी गाय आणि वासराही विठुरायाच्या दर्शनासाठी पायी मार्गस्थ झाले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण पंचक्रोशीत दिंडीची मोठी चर्चा रंगली आहे.
दिंडीचा शुभारंभ गोसेवक तथा दिंडीचे आयोजक ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक वातावरणात झाला. यावेळी गावातील वंदना उत्तमराव पाटील यांच्या हस्ते गाय-वासराचे हळद-कुंकू, फुले वाहून व ओवाळणी करून पूजन करण्यात आले. गोमातेच्या गळ्यात तुळशीचा हार घालून कपाळावर गंध लावण्यात आला. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बन्सीलाल इंदरचंद जैन, ज्येष्ठ प्राध्यापक भागवत महालपुरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी दिंडीला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. बन्सीलाल जैन यांनी, “गोमातेसह निघणारी ही दिंडी संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श असून कृषी संस्कृती आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम आहे,” असे सांगितले.
प्रा. भागवत महालपुरे यांनी सातगाव डोंगरीकरांनी निर्लोभ वारीचा संकल्प जपत इतिहास घडविल्याचे गौरवोद्गार काढले. तर मधुकर काटे यांनी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन देत हिरवा झेंडा दाखवून दिंडीला रवाना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. आर. वाघ यांनी केले. या प्रसंगी परिसरातील विविध भजनी मंडळे, नांदगाव, तिडका, वाकडी येथील टाळकरी, गावातील महिला, युवक तसेच शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलांच्या वर्षावात आणि भक्तिमय वातावरणात दिंडीने विठुरायाच्या दर्शनासाठी प्रस्थान केले.
वारकऱ्यांकडून कोणतीही वर्गणी नाही –
दिंडीचे आयोजक ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितले की, ही पूर्णपणे निर्लोभ पायी दिंडी असून सहभागी वारकऱ्यांकडून एक रुपयाही वर्गणी घेतली जाणार नाही. प्रत्येक वारकरी स्वतःचा खर्च स्वतः करणार आहे. मुक्या जनावरांनाही पांडुरंगाचे दर्शन घडावे, या भावनेतून गोशाळेतील गाय-वासराला दिंडीत सहभागी करण्यात आले असून दिंडी सुखरूप पंढरपूरला पोहोचावी, अशीच विठ्ठलचरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिला मुक्काम पाचोऱ्यात –
दिंडीचा पहिल्या दिवसाचा मुक्काम पाचोरा शहरातील विठ्ठल मंदिरात होणार असून, त्यानंतर सुमारे २० दिवसांत जवळपास ५०० किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करत आषाढी एकादशीपूर्वी दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे.






