जळगाव, 6 जुलै: बऱ्हाणपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांतील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली असून, या विकासकामांमुळे चारही शहरांतील अंतर्गत वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार आहे.
या विकासकामांच्या नियोजनासंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थानिक नागरिकांच्या मागण्या आणि आवश्यकतांचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्हाणपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. वाढती वाहतूक आणि शहरांमधील जागेची मर्यादा लक्षात घेऊन रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांना वळसा घालणाऱ्या बायपास मार्गाची उभारणी करण्यात येत आहे.
दरम्यान, बायपास मार्गामुळे शहरांतून जाणाऱ्या विद्यमान मुख्य रस्त्यांच्या विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन वाहतूक, व्यावसायिक व्यवहार आणि दळणवळणात अडचणी येऊ नयेत, यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर शहरांतील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
या कामांमुळे चारही शहरांतील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याबरोबरच शहरांचा सर्वांगीण विकास, दळणवळणात सुधारणा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: राज्यात मुसळधार पावसाचा कहर; विविध दुर्घटनांत 9 जणांचा मृत्यू, अनेक भागांत जनजीवन विस्कळीत






