चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव : एका लहानशा चिमुरडीवर अत्याचाराची घटना ही अत्यंत क्लेशदायी आणि वेदनादायी आहे. सुसंस्कृत अशा महाराष्ट्रात, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्या खरंच महाराराष्ट्राच्या जनतेची मान खाली घालणाऱ्या आहेत, या शब्दात घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
बदलापूरमध्ये एका शाळेत झालेल्या लहान मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. समाजातून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. त्यातच आता या घटनेवरुन रोहिणी खडसे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
बदलापूर येथे घडलेली, एका लहानशा चिमुरडीवर अत्याचाराची घटना ही अत्यंत क्लेशदायी आणि वेदनादायी आहे. सुसंस्कृत अशा महाराष्ट्रात, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्या खरंच महाराराष्ट्राच्या जनतेची मान खाली घालणाऱ्या आहेत. आज एका चिमुरडीवर जी घटना घडली आहे, तिच्यावर अत्याचार करणारे जेवढे दोषी आहेत, तेवढेच दोषी, तेथील पोलीस कर्मचारी आहेत, ज्यांनी 12 तास हा गुन्हा नोंदवायला वेळ घेतला. आज त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करणं अपेक्षित आहे.
आज निरपराध मुलींवर ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत, या घटना हेच दाखवतंय की, या महाराष्ट्रातील आज आम्ही महिला सुरक्षित नाही आणि आज कितीही सरकार, लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून 200 कोटी रुपये खर्च करुन जो प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करतंय, पण हे आजची जी घटना आहे किंवा गेल्या अनेक दिवसांत ज्या घटना घडल्या त्या सरकारचे डोळे उघडणाऱ्या घटना आहेत.
आम्हाला लाडक्या बहिणींचे 1500 रुपये नको आहेत, तर आम्हाला सुरक्षित वातावरण महाराष्ट्रात अपेक्षित आहे. कारण आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार आहे आणि एक महिला, बहिणी बाहेर पडल्यानंतर त्यांना एक सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि बदलापूरची घटना हे दाखवून देत आहे की, सरकार महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे. या निर्लज्ज सरकारला आम्ही सर्व महिला विचारतोय की, आम्हाला सुरक्षित असं वातावरण हवं आहे. आम्हा महिलांना, आमच्या मुलींना, आमच्या बहिणींना एक सुरक्षित वातावरण देणे तुमची जबाबदारी आहे.
आज सर्व जबाबदारी स्विकारुन गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा देऊन त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवली गेली पाहिजे आणि याबाबतचा निर्णय लवकरात लवकर सरकारने घेणे अपेक्षित आहे, अशी मागणीही त्यांनी केली.
बदलापुरात उद्रेक, 8 तासांपासून रेलरोको
बदलापूरमध्ये 3 वर्षांच्या मुलींवर शाळेत अत्याचाराच्या घटनेनंतर संतापाचा उद्रेक झाला. यानंतर मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकात पालकांसह नागरिकांनी आंदोलन केले. सकाळी 6 वाजेपासून रेल्वे स्थानकात आंदोलकांनी जमायला सुरुवात केली. त्यानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावर उतरत रेल रोको आंदोलन सुरू केले. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला. 30 लोकल गाड्या रद्द केल्या गेल्या. तर 11 लोकल वळवण्यात आल्या. याशिवाय काही एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावत आहेत.