जळगाव – जळगाव जिल्ह्यात पशुगणनेला सुरुवात झाली आहे. मागच्या महिन्यात 20 नोव्हेंबरपासून जळगाव जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून या पशुगणनेला सुरुवात करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात 24 टक्के पशुंची गणना झाली आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी वाहेद तडवी यांनी याबाबतची माहिती दिली. या पशुगणनेचा उद्देश काय आहे हे आपण जाणून घेऊयात.
जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या या पशुगणना मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह यांची गणना केली जाणार आहे. यामध्ये पशुगणनेमुळे जनावरांची संख्या नेमकी किती आहे, हे स्पष्ट होते. तसेच ही संख्या स्पष्ट झाल्यानंतर त्यानुसार शासनाकडून धोरण, योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते. इतकेच नव्हे तर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे, त्यावरुन लसीकरणासाठी औषधीचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पशुगणना आवश्यक आहे, असे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, 1 सप्टेंबरपासूनच ही पशुगणना सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, काही कारणांमुळे ही पशुगणना 20 नोव्हेंबरपासून करण्यात आली आहे. यामध्ये महिनाभरातच 24 टक्के पशुंची गणना झाली आहे. तसेच 28 फेब्रुवारीपर्यंत पशुगणना होणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 519 गावे, तसेच 311 नगरपंचायतींचे वॉर्ड, अशा एकूण 1 हजार 830 ठिकाणी ही पशुगणना होणार आहे. या पशुगणनेसाठी जिल्हा परिषदेकडून 284 प्रगणक नेमण्यात आले आहेत. तर 68 पर्यवेक्षक पशुगणनेत पर्यवेक्षकीय काम करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.