नवी दिल्ली, 9 मे : भारत आणि पाकिस्तानात सध्या मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरापतींमुळे भारताकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जातेय. अशातच एक मोठी बातमी समोर आलीय. भारतात सुरू असलेल्या इंडियन प्रिमिअर लिग अर्थात आयपीएलची स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. भारत-पाकच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अंतिम टप्प्यातील सामने थांबवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय.
धरमशाळा मैदानावरील सामना झाला होता रद्द –
आयपीएलच्या 18 व्या हंगामातील पंजाब किंग्स विरूध्द दिल्ली कॅपिटल्सचा सामना काल धरमशाळा क्रिकेट मैदानावर सुरू होता. मात्र, पाकिस्तानकडून जम्मू, राजस्थान तसेच पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी धरमशाळा मैदानावरील सामना रद्द करण्यात आला. तेव्हापासूनच आयपीएलचे पुढील सामने खेळवले जातील की नाही, याबाबत बीसीसीआयकडून मोठी भूमिका घेतली जाण्याची शक्यता होती.
आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित –
भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. पाकिस्तानाकडून ड्रोन हल्ले केले गेल्याने खेळाडू तसेच क्रिकेट मैदानात उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला जात होता. दरम्यान, खबरदारी म्हणून आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.
उर्वरित 16 सामन्यांना स्थगिती –
भारतात सध्या आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू होता. अंतिम टप्प्यात हा हंगाम आला असतानाच बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आयपीएलच्या उर्वरित 16 सामन्यांना स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे परदेशी खेळाडू हे देखील आता त्यांच्या मायदेशात परतण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, आयपीएलचे उर्वरित 16 सामने कधी खेळवले जातील, याबाबत अधिकृतरित्या माहिती जाहीर करण्यात आलेली नाहीये.
हेही वाचा : Breaking! पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांमुळे वातावरण तापलं; भारताची लाहोरमधूनच प्रत्युत्तरास सुरूवात