देहू (पुणे), 16 मार्च : देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375 वा बीज सोहळा आज पार पडतोय. या सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी देहू संस्थानचे विश्वस्त यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, संत तुकाराम महाराज मूर्ती, पुष्पहार, चिपळ्या, संत गाथा आणि सन्मानपत्र एकनाथ शिंदेंना प्रदान करण्यात आले. यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार तथा शिवसेना उपनेते विजय शिवतारे तसेच वारकरी उपस्थित होते.
देहू संस्थानच्यावतीने उपमुख्यमंत्री शिंदेंचा सन्मान –
एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना पंढरपूर वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा- सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि ‘निर्मल वारी, हरित वारी’ संकल्पनेत योगदान दिले होते. दरम्यान, त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यासोबतच शिंदे यांनी पालखी सोहळ्यातील दिंड्यांना आर्थिक सहाय्य, स्वच्छता मोहिमा आणि इतर सेवा- सुविधांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. दरम्यान, गेल्या 25 वर्षांपुर्वी हाच सन्मान माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना देण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, माझ्या मनात एक आनंद निर्माण झाला आहे. वारकऱ्यांविषयी आधी जो आदर होता. तो आता अधिक वृद्धिंगत झालाय. जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार हा माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पुरस्कार देहूच्या संस्थेना दिला. यामुळे मी देहू संस्थांच्या विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. खरंतर, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या वारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिण-भावांचा, जेष्ठांचा या सर्वांचा आहे.
म्हणून समाजाची सेवा अधिक जोरकसपणे करण्याची प्रेरणा पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली आहे. वारकऱ्यांची संधी मला या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली असून वारकऱ्यांसाठी काम करण्याची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची याठिकाणी भेट झाली होती. आणि अशा पवित्र भूमीत मला पुरस्कार मिळतोय, याच्यापेक्षा दुसरे भाग्य नसल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
देहूत तुकाराम बीज निमित्त सोहळा –
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या बीज सोहळा आज देहूत पार पडतोय. दरम्यान, तुकाराम बीज निमित्त लाखो वारकरी आज देहूत दाखल झाले आहेत. आज दुपारी ठीक बारा वाजता कीर्तन झाल्यानंतर नांदूरकीच्या झाडावर वारकरी पुष्प अर्पण करताच हा सोहळा पार पडणार आहे.
हेही वाचा : घरकुलांना मोफत वाळू मिळणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती, नेमकं काय म्हणाले?