जळगाव, 1 जानेवारी : गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते/ पाणंद / पांधण / शेतरस्ते /शिवाररस्ते / शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करावे, वहिवाटीचे रस्ते मोकळे करुन तयार करण्याच्या सूचना जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. जळगाव जिल्हयातील अनेक शेतकरी शेतात जाण्याकरीता तसेच शेतमाल शेतातून बाहेर काढण्याकरीता वारंवार रस्त्यांची मागणी करीत असतात. यांच्या अडचणी सोडविणे आवश्यक असल्याने रस्ते कालबध्द रितीने खुले करणे व मातोश्री ग्रामसमृधी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरुपी रस्ते तयार करणे या करीता कालबध्द कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात 10 टप्प्यात 1 जानेवारी 2025 ते 13 फेब्रुवारी 2025 दरम्यान गट विकास अधिकारी, उपअधिक्षक, भूमी अभिलेख व तहसिलदार यांच्या सहाय्याने रस्ता खुला करणे व जे रस्ते खुले करण्यात येतील असे रस्ते मातोश्री ग्रामसमृधी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत घेऊन कालबध्द कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व कार्यान्वयन संबंधीत तालुक्याचे गटविकास अधिकारी हे करणार आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी तहसिलदार, उपअधिक्षक भूमी अभिलेख व पोलिस निरिक्षक यांच्या सहकार्यने ग्रामीण भागातील ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब), पायमार्ग कालबध्द रितीने खुले करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबधित अधिकाऱ्यांना एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive