मुंबई, 29 एप्रिल : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. या घोषणेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडे, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला. हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय कालच मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केला होता.
काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यावेळी 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर भारत सरकारने कठोर निर्णय घेतले आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये 1960 मध्ये सिंधू पाणी करार करण्यात आला होता. आता हा करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील, असे सांगण्यात आले आहे.