जळगाव, 26 जून : मागील दोन दिवसांपासून किनारपट्टी भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच महाराष्ट्रात आजपासून पुढील पाच दिवस पावसाचा जोर असणार आहे. यासोबतच राज्यातील काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यास अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे –
हवामान विभागाच्या अंदाजनानुसार विदर्भ, मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून 26 ते 30 जून दरम्यान राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट –
सध्या कोकणातील सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिह्यात पावसाची संततधार सुरू आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच संपूर्ण विदर्भाला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय? –
उत्तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. असे असताना कालपासून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध भागात पुढील चार दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.