चाळीसगाव, 28 जुलै : महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी, विद्यार्थिनींसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच गोरगरीबांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. चाळीसगाव येथील नुतन प्रशासकीय इमारतीचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करून महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली. माणूस कामाने मोठा होत असतो त्यामुळे प्रामणिकपणे काम करीत रहा तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द रहा असे सांगितले. अशा वास्तू सर्वसामान्यांच्या कराच्या पैशातून उभ्या राहतात, त्यामुळे या वास्तू सर्वसामान्यांच्या आहेत , याची जाणीव ठेवूनच इमारतीत आल्यास स्वच्छता राखावी, कुठेही थुंकू नये हा मोलाचा सल्ला दिला.
इमारतीमुळे नागरिकांच्या समस्या सुटणार –
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांच्या समस्या सुटणार असल्याचे सांगितले.शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली.तसेच शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतर योजनाची माहिती दिली.
प्रशासकीय कामकाज देखील चांगले राहिल –
आमदार मंगेश चव्हाण यांनी मध्यवर्ती प्रशासकीय उभारणीबाबत माहिती देत तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनोगत व्यक्त करतांना 16 महिन्यात उभारण्यात आलेल्या देखण्या व भव्य प्रशासकीय इमारतीचे कौतुक करत येथील प्रशासकीय कामकाज देखील चांगले राहिल अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अभियंता बैसाणे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे समोरोप करण्यात आला.
यांची होती उपस्थिती –
यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकांम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, अधिकक्षक अभियंता प्र,पी.सोनवणे, प्रांतधिकारी प्रमोद हिले, तत्कालिन प्रांतधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार प्रशांत पाटील,तत्कालिन तहसिलदार अमोल मोरे, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे,उ पविभागीय अभियंता अ.ना.बैसाणे, कार्यकारी अभियंता एस.के.पाटील, मुख्यधिकारी सौरभ जोशी, तात्कालिन मुख्यधिकारी प्रशांत ठोंबरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर आदीसह कृषी बाजार समिती संचालक मंडळ, आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.