जळगाव, 27 जानेवारी : राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमातंर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांच्यामार्फत करण्यात आले.
कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, शासकीय कामकाजात AI व Block Chain चा वापर तसेच GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अशा एकूण सात सर्वंकष निकषांवर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आलेल्या या निकालात जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव याची राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालय म्हणून उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले असून, लवकरच राज्य शासनातर्फे सर्व विजेत्या कार्यालयांचा गौरव करण्यात येणार आहे.






