जळगाव, 9 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.
तसेच जळगाव जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठीड्रोन कॅमेरे, लाईव्ह स्ट्रीमिंग, भरारी पथके व कडक पोलिस बंदोबस्त यांचा वापर करण्यात येणार असल्याची माहितीही रोहन घुगे यांनी यावेळी दिली. दहावी-बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी 9 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रोहन घुगे काय म्हणाले? –
जिल्हाधिकारी रोहन घुगे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, जळगाव जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात बारावाची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालवधीत पार पडणार आहे. यामध्ये बारावीच्या परीक्षेसाठी 59 हजार 421 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी 33 हजार 653 विद्यार्थी परीक्षेला समोरे जाणार आहे. बारावाची परीक्षा 82 तर दहावीची परीक्षा 147 केंद्रांवर पार पडणार आहे. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रंणा बसविण्यात आली आहे.
ज्याठिकाणी सीसीटीव्हीज नाही त्याठिकाणी झूम लिंकची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रश्न पत्रिकेच्या वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्त असणार आहे. परीक्षा केंद्रावरून 500 मीटरच्या अंतरावर झेरॉक्स सेंटर बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे रोहन घुगे यांनी सांगितले.
तसेच 50 मीटरच्या आत कोणालाही प्रवेश राहणार नाही. परीक्षा स्तळावर कार्यरत असलेल्यांना ओळखपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. जो पेपर आहे त्या विषयीचे शिक्षक, लॅब असिस्टंट अथवा त्यांसबंधातील कोणीही त्याठिकाणी उपस्थित राहणार नसून कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.
कॉपीमुक्तीसाठी आवश्यक खबरदारी –
मागील वर्षी पार पडलेल्या ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार उघडकीस आला त्या केंद्रावर परीक्षा घेण्यासाठी बाद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांवर बैठे पथकासोबतच संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेरा, व्हिडिओग्राफी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच केंद्र, तालुका तसेच जिल्हास्तरावर भरारी पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षांना सामोरे जावे –
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात शांततापुर्ण तसेच कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षांना सामोरे जावे. तसेच पालक आणि शिक्षकांनी देखील परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.
परीक्षेच्या कामासाठी मोबाईलचा जो वापर आवश्यक आहे, तेवढ्याच कामासाठी मोबाईल वापराला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याव्यतिरिक्त मोबाईल वापराचा गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिला आहे.
हेही वाचा : लाडकी बहिण योजनेसंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रशासनाला महत्वाचे आदेश






