जळगाव, 18 एप्रिल : ज्या वसतिगृहात आपण शिकत आहात त्या वसतिगृहाची ओळख ही आपल्या राबवलेल्या उपक्रमातून सांस्कृतिक शैक्षणिक केंद्र बनले पाहिजे. न्याय हक्क यासाठी आंदोलन राबवले पाहिजेच, परंतु मिळत असलेल्या गोष्टीतून आपली सामाजिक, राजकीय, आर्थिक उन्नती केली पाहिजे, असे आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जिल्हाधिकारी आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांसह हितगुज करताना विचार मांडले.
यावेळी ‘वेटिंग फॉर व्हिसा’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रा. संदीप केदार अनुवादित इंदाई प्रकाशनने प्रकाशित केलेल्या 500 पुस्तकांचे जैन इरिगेशन यांच्या सौजन्याने मोफत वितरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये अरुण पवार, प्रकल्प अधिकारी यांनी वसतिगृहास देण्यात आलेल्या विविध सोयीसुविधांची माहिती दिली. सदर सोयीसुविधा उपलब्धतेकरिता मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री जळगाव तसेच जिल्हाधिकारी, जळगाव यांचा उत्तम सहयोग लाभल्याचे यावेळी नमूद केले.
यावेळी मंचावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जैन इरिगेशनचे मिडिया विभागाचे अनिल जोशी, जिल्हा कृषि अधीक्षक कुर्बान तडवी, प्रशांत माहुरे व श्री जावेद तडवी सहाय्यक प्रकल्प अधिकारी, प्रा. संदीप केदार, द इंडियन एक्स्प्रेसचे अनिल सोनवणे आणि बांभोरी गावाचे सरपंच बिऱ्हाडे तसेच गृहप्रमुख संतोष बच्चे व विजय गाडे, वासुदेव बच्चे, अलंका दाभाडे, मीनाकुमारी चौधरी हे उपस्थित होते.