चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 18 मार्च: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार आज 18 मार्चपासून ते 22 मार्चपर्यंत रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी ही राज्यातील एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. कुस्ती खेळाडू आणि कुस्ती प्रेमीसाठी हा एक प्रकारचा कुंभ मेळावाच असतो. दरम्यान, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे राज्याचे लक्ष लागले असताना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पहिलवान हितेश पाटील हा देखील 125 किलो वजनी गटातून स्पर्धेत सहभागी झाला आहे.
यासोबतच, शिवराज राक्षे, सिकंदर शेख, पृथ्वीराज मोहोळ, हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील, माऊली कोकाटे, माऊली जमदाडे, प्रकाश बनकर, कालीचरण सोलणकर यांच्यासह अन्य मल्लांचा या स्पर्धेत समावेश असणार आहे.
पहिलवान हितेश पाटीलची प्रतिक्रिया –
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर पहिलवान हितेश पाटीलने सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली की, आजपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरूवात होत आहे. मागील काही वर्षांच्या मेहनतीनंतर यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी 125 किलो वजनी गटातून जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र ट्रिपल महाराष्ट्र केसरी पहिलवान विजय चौधरी यांनी देखील याच गटातून जिल्ह्याचे नेतृत्व करत तीन वेळा मानाची गदा मिळवली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आज या स्पर्धेत सहभागी झालो आहे. त्यांच्याच सावलीप्रमाणे पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्याचे नाव महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उंचवायचं आहे. यासाठी ईश्वराचा कृपा, आई-वडिलांचा तसेच जनतेचा आशीर्वाद आवश्यक असल्याचे पहिलवान हितेश पाटील यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी –
थायलंडमधील बँकॉक येथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन कमिटीच्या मान्यतेने आयोजित इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली होती. या स्पर्धेत पाचोऱ्याचा सुपुत्र हितेश पाटील याने आंतरराष्ट्रीय आखाड्यावर थायलंडच्या बलाढ्य पहेलवानावर मात करत त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय मिळवल्यानंतर तो आता महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
महाराष्ट्र केसरीसाठी ‘या’ पद्धतीने होते निवड –
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सर्वात आधी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तालुकास्तरावर निवड चाचणी घेण्यात येते. यामध्ये तालुक्यातील सर्व गावातील विविध वजनगटातून कुस्तीपटूंची निवड करण्यात येते. यामध्ये एका वजनी गटातून एक असे प्रत्येकी एक कुस्तीपटुची निवड जिल्हास्तरावर केली जाते. यानंतर तालुकास्तरावर निवड झालेल्या कुस्तीपटूंची जिल्हा निवड चाचणी पार पडते. जिल्हास्तरावर निवड झालेले कुस्तीपटू आपापल्या जिल्ह्याचे नेतृत्व महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानावर करतात.
‘असे’ असतात वजनी गट –
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी विविध वजन गटात विभागणी केली जाते आणि हे वजन गट माती व गादी (मॅट) विभागात दोन ठिकाणी खेळले जातात. 57 , 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97, 125 किलोग्रॅम या वजनी गटांचा यामध्ये समावेश असतो.






