जळगाव, 12 फेब्रुवारी : राज्यभर सध्या उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परीक्षा सुरू असून येत्या २० फेब्रुवारी २०२६ पासून माध्यमिक (इयत्ता १० वी) परीक्षांना सुरुवात होत आहे. शहरातील बहुतांश शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा काळात शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात शांतता राखणे अत्यावश्यक असल्याचे जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट केले आहे.
गोंगाट आणि मोठ्या आवाजामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत बाधा निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. विशेषतः परीक्षेच्या काळात ध्वनीप्रदूषण टाळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, जळगाव शहरातील जी.एस. ग्राऊंड आणि सागर पार्क या मैदानांवर विविध क्रिकेट प्रीमियर लीग सामने सुरू आहेत. या सामन्यांदरम्यान लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात समालोचन केले जात असल्याने जवळील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील विविध कार्यक्रम व क्रिकेट स्पर्धांचे आयोजक यांना जाहीर आवाहन केले आहे की, परीक्षा कालावधीत शक्यतो कार्यक्रमांचे आयोजन टाळावे. तसेच ध्वनीक्षेपकांचा आवाज विहित मर्यादेत ठेवावा. सायंकाळी ६ नंतर आवाज कमीत कमी ठेवावा आणि रात्री १० नंतर ध्वनीक्षेपक पूर्णपणे बंद करावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.






