मुंबई, 26 फेब्रुवारी: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या मजुरीचा मुद्दा मनोज कायंदे, धर्मरावबाबा आत्राम, बबनराव लोणीकर, प्रशांत बंब तसेच नितीन राऊत यांनी उपस्थित केला. यावेळी सभागृहात वातावरण तापल्याचे दिसून आले. दरम्यान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) निधी उपलब्धतेसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असून निधी प्राप्त होताच तात्काळ रोजगार हमी योजनेचे पैसे मजुरांना वितरित करण्यात येईल, अशी माहिती रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
View this post on Instagram
रोहयो मंत्री भरत गोगावले काय म्हणाले? –
राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या थकीत मजुरीबाबत आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना रोहयो मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले की, रोजगार हमी योजना पूर्वीप्रमाणेच सुरू असून, मजुरांना नियमांनुसार मजुरी दिली जात आहे. कोणत्याही मजुराला कमी करण्यात येणार नाही. रोजगार हमी योजनेचा ‘जी रामजी’ योजनेत रूपांतर करण्यात येत असले तरी त्याचा मजुरांच्या उपस्थितीवर किंवा मजुरीवर कोणताही परिणाम होणार नाही. योजना पूर्ववत सुरू राहील आणि मागणीनुसार काम दिले जाईल.
आयुक्त किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निधी देण्याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. जर तक्रार आली तर चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. ज्यांनी प्रत्यक्ष काम केले आहे, त्यांचे सर्व पैसे नियमांनुसार दिले जातील; कोणावरही अन्याय होणार नाही, असेही रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.






