जळगाव, 24 डिसेंबर : महायुती सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावच्या पालकमंत्रीपदाबाबत भाष्य केलं आहे.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
मंत्री गिरीश महाजन जळगावात पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले की, आमची तीनही पक्षांची महायुती आहे. यामुळे जळगावच्या पालकमंत्रीपदाबाबत आमचे नेते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. मात्र, राज्यात ज्यापद्धतीने पालकमंत्रीपदाबाबत वाद सुरूय तसे जळगावच्या पालकमंत्रीपदाबाबत आमच्यात कुठेही वादविवाद नाहीयेत. दरम्यान, जळगावच्या पालकमंत्रीपदाबाबत आमची जरी इच्छा असली तरी महायुतीत जो निर्णय होईल. तो आम्हाला मान्य राहील असेही मंत्री महाजन म्हणाले.
व्हिडिओ –
अनिल पाटील नशीबवान –
महायुती सरकारमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांना वगळण्यात आले आहे. यावर बोलताना मंत्री महाजन म्हणाले की, अनिल पाटील हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आणि अडीच वर्ष त्यांना मंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळाली. यामुळे ते खूप नशिबवान आहेत. मात्र, यावेळेला त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. कारण महायुतीतील आमदारांची संख्याच एवढीच आहे की, 237 महायुतीचे सदस्य निवडून आलेले आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना मंत्रीपदासाठी संधी द्यावी लागली. दरम्यान, अनिल पाटील हे मंत्रीपद मिळाले नसल्याने कुठेही नाराज नाही, असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
पुढील दोन-तीन दिवसांत पदभार स्विकारणार –
महायुती सरकारमध्ये गिरीश महाजन यांना जलसंपदा विभागाची मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी जलसंपदा मंत्री हे राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात विभागून दिले आहे. तसेच गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, पुढील दोन-तीन दिवसात मंत्री महाजन हे जलसंपदा खात्याचा पदभार हाती घेणार असून जलसंपदा खात्याचा मंत्री म्हणून असताना राज्यातील कुठलाही प्रश्न प्रलंबित राहू देणार नाही, असे मंत्री महाजन म्हणाले.
हेही पाहा : Accident News : धरणगाव तालुक्यात लक्झरी बसचा भीषण अपघात; एक महिला जागीच ठार