नाशिक, 27 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण भाषणात बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही असा आरोप करत नाशिकमध्ये वनरक्षक माधवी जाधव संतापल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या संपुर्ण प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
नाशिकमध्ये काय घडलं? –
वन विभागातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ घातल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोघींनाही ताब्यात घेऊन सरकार वाडा पोलीस ठाण्यात आणले. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण भाषणात बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही असा आक्षेप त्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतला.
अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी –
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेनंतर माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी पोलीस ठाण्याबाहेर जमून मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी नाशिक पोलीस पुढील कारवाई करत आहेत. तसेच, संबंधित वनरक्षक महिला कर्मचाऱ्यांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया –
मंत्री गिरीश महाजन माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, आज मला अत्यंत वाईट वाटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी नेहमीच सक्रिय सहभाग घेतो. अनेकदा नेते केवळ उपस्थित राहून हार अर्पण करून निघून जातात; मात्र मी स्वतः गाव व तालुका पातळीवर जयंती कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होत असतो. गेल्या चाळीस वर्षांत मी कधीही यापासून दूर राहिलो नाही.
मंत्री गिरीश महाजन व्यक्त केली दिलगिरी –
मी मातंग समाज, वाल्मिकी समाज यांच्या कार्यक्रमांना, विवाह समारंभांनाही आवर्जून उपस्थित राहतो. माझे संस्कार संघाच्या मुशीत घडलेले आहेत. जामनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्याचे कार्यही करण्यात आले आहे. एखादी बाब अनावधानाने राहिली असेल, तरीही यावरून एवढा मोठा वाद निर्माण होणे मला समजत नाही. दरम्यान, मी याबाबत दिलीगिरी व्यक्त केली असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.
समाजात तेढ निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये –
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा आणि ते विचार जपणारा माणूस आहे. माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी केली जात आहे, मात्र त्याचे कारण काय, हेच मला समजत नाही. समाजात तेढ निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. संबंधित भगिनी कोण आहेत, हेही मला माहीत नाही. मी गावात पंगती घालतो, सर्व समाजबांधवांसोबत एकत्र बसून जेवण करतो. गेल्या चाळीस वर्षांत मी अंगात निळा शर्ट घातला नाही, असे कधीही घडलेले नाही.
दरम्यान, जामनेरमध्ये नगरसेवक असोत किंवा पंचायत समिती सदस्य, ते सर्व समाजाच्या सहभागातून निवडून आले आहेत. यामध्ये प्रत्येक समाजाचा वाटा आहे. आम्ही शाम बडोदे यांना उमेदवारी दिली होती; हेच आमच्या सर्वसमावेशक आणि समताधिष्ठित राजकारणाचे उदाहरण आहे, असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ठ केले.






