मुंबई, 10 फेब्रुवारी : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादांच्या विमान अपघाताची घटना 28 जानेवारी रोजी सकाळी घडली. यामध्ये अजित दादांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, अजित दादांच्या निधनाच्या 13 दिवसानंतर आज आमदार रोहित पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अजित दादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या 13 दिवसांत अजित दादांच्या विमान अपघाताबाबत जी माहिती समोर आली नाही ती माहिती मी समोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस –
अजित दादांचा विमान अपघात का आणि कसा झाला याची माहिती समोर आणणे हे आमची प्राथमिकता असून त्यासाठी आम्ही हे संशोधन केल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. अजित दादांच्या विमान अपघातानंतर आमदार रोहित पवार आणि त्यांच्या काही सहकार्यांनी संशोधन करत महत्वाची माहिती समोर आणली आहे. आमदार रोहित पवार यांनी एक पीपीटी शेअर करत विमान अपघाताबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. संशोधनाच्या माहितीच्या आधारावर आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातापुर्वीचा संपुर्ण घटनाक्रम सांगितलाय.
आमदार रोहित पवारांनी सांगितला अपघाताचा घटनाक्रम –
- दादांना मुंबईहून बारामतीसाठी 210 किमीचा प्रवास करायचा होता
- या प्रवासासाठी 27 मिनिटे निर्धारित होती
- अजितदादा हे 7 वाजून 50 मिनिटांनी एअरपोर्टवर आले
- दादांचे विमान 8 वाजून 10 मिनिटांनी टेक ऑफ केलं
- 8.22 वाजता ते विमान हे लोणावळाजवळ असेल
- 8.43 ते 8.45 दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली
- 9 वाजता दादा गंभीर असल्याची माध्यमांद्वारे माहिती
- 9.45 वाजता दादांचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी आली
‘अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती!’ –
अजित पवार यांच्या मृत्यूबाबत राज्यात आजही अनेक प्रश्न उपस्थित होत असताना, त्यांच्या निधनावर विश्वास ठेवण्यास काही जण तयार नसल्याचे चित्र आहे. अजित दादा पुन्हा परत येतील, अशा अफवाही महाराष्ट्रात पसरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले.
ते म्हणाले की, अजित दादांच्या विमान अपघाताची घटना घडली आहे. मलाही सुरुवातीला असं वाटत होतं की अशी दुर्दैवी घटना व्हायला नको होती, मात्र ते कटू सत्य आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी अजित दादांचा स्वेटर आणि चपला सापडल्या आहेत. तसेच ते नेहमी घालायचे ते घड्याळही घटनास्थळी आढळून आले. अजित दादा आपलं घड्याळ नेहमी पंधरा मिनिटे पुढे लावून ठेवत असत. या सर्व बाबींमुळे वस्तुस्थिती स्पष्ट आहे आणि आता सर्वांनी सत्य स्वीकारण्याची गरज आहे.
घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं –
- दादांचा दौरा बदलणे
- विमानाची वेळ बदलणे
- पायलट बदलणे
- केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल आणि एटीसी ट्रान्सस्क्रिप्ट यांच्यामधील वेळेचे विसंगती
- फ्लाइट रडारचा एक मिनिट आधीच बंद पडलेला डेटा
- व्हिजिबिलिटी कमी असताना विमान लँड करणे
- रनवे -11 वर उतरण्याचा आग्रह
- विमान कमी उंचीवर आणले जाणे
- शेवटची काही मिनिटे पायलट एकही शब्द बोलला नाही
विमान कंपनीबाबत उपस्थित केले गंभीर प्रश्न –
अजित दादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते व्हीएसआर कंपनीचं लेअरजेट विमान होतं. विजय कुमार आणि रोहित सिंह असे दोन डायरेक्टर असून योबतच या कंपनीचे 27 स्टेक होल्डर्स आहेत. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून याबाबतची सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
विमान प्रवासाचा खर्च वाचावा म्हणून व्हीएसआर कंपनी बऱ्याचदा अतिरिक्त इंधन न्यायचे अशी खात्रीलायक माहिती आहे. दरम्यान, असे पेट्रोल जर विमानात ठेवण्यात येत असेल तर ते विमानासाठी बॉम्बच असू शकेल, असा संशय व्यक्त करत या कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा अशी आमची मागणी असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
View this post on Instagram
हेही वाचा : Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर






