जळगाव, 23 फेब्रुवारी: गावाचा विकास हा केवळ आमदार किंवा खासदारांवर अवलंबून नसून तो मुख्यत्वे सरपंचांवर अवलंबून असतो. सरपंचांची सकारात्मक मानसिकता आणि गावाच्या विकासाप्रती असलेली बांधिलकीच खऱ्या अर्थाने गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणते, असे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांनी केले. जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आज 23 फेब्रुवारी रोजी क्वालिटी ‘कौन्सिल ऑफ इंडिया’च्यावतीने आयोजित ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊ साहेब अकलाडे, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे हिमांशू पटेल यांचेसह इतर अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सरपंच हा विकासाचा कणा आणि केंद्र –
या कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या वेळी रक्षा खडसे म्हणाल्या की, ग्रामसभेत गावाच्या विकासाचे नियोजन करणे महत्वाचे असते, शासनाचा संपूर्ण पाठिंबा सरपंचांच्या पाठीशी आहे. सरपंच हा विकासाचा कणा आणि केंद्र आहे. या अशा प्रकारच्या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून सरपंच सक्षम होण्यास मदत होणार आहे.
दोन दिवशीय प्रशिक्षण –
ग्रामपंचायतीचा डेटा हा प्रत्येक सरपंचांजवळ असल्यास विकासाला बाधा येत नाही. हे सांगतानाच त्यांनी स्वतःचे उदाहरण देत त्यांचा सरपंच ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतचा प्रवास या वेळी विषद केला. या दोन दिवशीय प्रशिक्षणाला जिल्ह्यातील सर्व सरपंचांना आमंत्रीत करण्यात आले आहे. या संवाद कार्यक्रमात ट्रेनर कविता वारे व सविता पांडे, विशाल चौधरी व सतीश उगले हे उपस्थित सरपंच व विस्तार अधिकारी यांना प्रशिक्षण देणार आहेत.






