जळगाव, 21 मार्च: जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण लेवा पाटीदार समाजासाठी कु. नंदिनी संजीव पाटील यांचे UPSC मधील यश अत्यंत अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे समाजाचे नाव देशपातळीवर उज्ज्वल झाले असून, ही कामगिरी तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, लेवा पाटीदार समाज हा कष्टाळूपणा, शिक्षणनिष्ठा व प्रगतीशील विचारसरणीसाठी ओळखला जातो. कु. नंदिनी पाटील यांनी या परंपरेला नवी उंची देत समाजाचे सामर्थ्य अधोरेखित केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी मोठी स्वप्ने पाहून जिद्द, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करत त्यांनी नंदिनी पाटील यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) प्रतिष्ठित परीक्षेत कु. नंदिनी संजीव पाटील यांनी ऑल इंडिया रँक ५१२ मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले असून, त्या लेवा पाटीदार समाजातून UPSC उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्याच मुलगी ठरल्या आहेत. त्यामुळे हा क्षण समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. त्यांचे वडील संजीव देविदास पाटील व आई सौ. शिल्पा संजीव पाटील हे जळगाव येथे खाजगी क्लासेसच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य करतात.
दरम्यान, या यशाबद्दल जळगाव येथे कु. नंदिनी पाटील यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यांची होती विशेष उपस्थिती –
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेवक पियुष कोल्हे, कुंदन काळे, आशुतोष पाटील, प्रवीण कोल्हे, उद्योजक किशोर डालू ढाके, भरत धर्मा खडके, ज्ञानेश्वर गोपाळ भोळे, तुषार महाजन, स्वीय सहाय्यक हेमंत नारखेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कु. नंदिनी पाटील यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.






