नवी दिल्ली – पोप फ्रान्सिस यांचं आज 21 एप्रिल रोजी निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. कासा सँटा मार्टा या व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डिनल केविन फॅरेल यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचलं. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला आयुष्यातली मूल्यं शिकवली. तसंच धैर्य आणि प्रेम यांचा संदेश दिला.
रोमन कॅथलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचं आज निधन झालं. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. फेब्रुवारी महिन्यात रोम येथील जेमेली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती आधी ढासळली होती, पण नंतर हळूहळू त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आज सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांची प्राणज्योत मालवली.
कार्डिनल केविन फॅरेल यांनी घोषणा केली की, “प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला आपल्या पवित्र फादर फ्रान्सिस यांच्या निधनाची घोषणा अत्यंत दुःखाने करावी लागते. आज सकाळी 7.35 वाजता, रोमचे बिशप फ्रान्सिस, पित्याच्या घरी परतले. त्यांचे संपूर्ण जीवन प्रभूच्या आणि त्यांच्या चर्चच्या सेवेसाठी समर्पित होते.”
कार्डिनल जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांची 2013 मध्ये बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांना पोप फ्रान्सिस म्हटलं जातं. पोपपदी येणारे युरोपबाहेरचे ते पहिले पोप ठरले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली –
दरम्यान, पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी म्हटले की, परमपूज्य पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने खूप दुःख झाले. या दुःखाच्या आणि स्मरणाच्या वेळी, जागतिक कॅथोलिक समुदायाप्रती माझे मनःपूर्वक संवेदना. पोप फ्रान्सिस यांना जगभरातील लाखो लोक करुणा, नम्रता आणि आध्यात्मिक धैर्याचे आदर्श म्हणून नेहमी स्मरणात ठेवतील. त्यांनी तळमळीने गोरगरिबांची सेवा केली. ज्यांना दुःख होते त्यांच्यासाठी त्यांनी आशेचा आत्मा प्रज्वलित केला. मला त्यांच्यासोबतच्या माझ्या भेटींची आठवण येते आणि सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासाच्या त्यांच्या वचनबद्धतेने मला खूप प्रेरणा मिळाली. भारतातील लोकांबद्दलचा त्यांचा स्नेह सदैव जपला जाईल. त्यांच्या आत्म्याला देवाच्या मिठीत चिरशांती लाभो,’ या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.