मुंबई, 8 जुलै : नर्मदा पाणी वाटप निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला 10.89 टीएमसी पाणी येते. हे पाणी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी भागाला देण्यासाठीची प्रक्रिया येत्या एक वर्षात पूर्ण केली जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते. यावेळी सदस्य चंद्रकांत रघुवंशी, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा हे भाग डोंगराळ असल्याने पाणी अडवण्यात अडचणी असल्याचे सांगून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, भौगोलिक परिस्थितीमुळे नर्मदा नदीतून 5 टीएमसी आणि तापी नदीतून 5.59 टीएमसी पाणी घेण्याचा करार गुजरात राज्याशी 2015 मध्ये करण्यात आला आहे.
या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी 5 हजार 517 कोटींचा एक आणि 957 कोटींचा एक असे दोन प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्याचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. याच्या सर्व मंजुऱ्या आठ ते दहा महिन्यात देण्यात येतील आणि येत्या एक वर्षात हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.






