संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा (जळगाव), 8 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील सन 2022-23 या वर्षाचे 8000 शेतकरी व 23-24 या वर्षातील 32 हजार 402 शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेतून आपल्या शेतात संच बसवले असून शासनाकडे अंदाजित 188 कोटी सबसिडी ची रक्कम घेणे बाकी असून अद्याप पर्यंत सदर सबसिडीची रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने व सन 2023 चा पिक विमा पूर्ण जमा न झाल्याने महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वात 9 ऑगस्ट अर्थात क्रांतीदिवशी 11 वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. याबाबतचे निवदेन जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
निवेदनात नमूद केल्यानुसार, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सन 2022-23 व 23-24 या वर्षात आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन बसवले होते. या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80 टक्के व महाभूधारक शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान सबसिडी राज्य शासन व केंद्र शासना च्या माध्यमातून दिली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील 2023 चे 8000 व 2024 चे 32402 अंदाजे 188 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही मिळालेली नाहीत. यावर वारंवार विनंती करून देखील शासन सदर अनुदान वर्ग करत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कर्जबाजारी झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा –
तसेच सन 2023 या वर्षातील पिक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अत्यल्प प्रमाणात जमा झाल्याने नुकसान जास्त आणि पिक विमा कमी अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वात 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आक्रोश मोर्चा निघणार आहे.
असे आहे मोर्चाचे नियोजन –
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ जळगाव येथे जिल्ह्यातील शेतकरी हजर होतील व ते स्टेट बँक, बस स्टँड, स्वातंत्र चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावरती सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांचा आक्रोच मोर्चा धडकणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव व जिल्हा कृषी अधीक्षक जळगाव यांना देण्यात आले आहेत. या आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी 9890875238 हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला असून शेतकऱ्यांनी यांसदर्भ संपर्क साधावा, असे संघटनेतर्फे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा : चोपडा-अमळनेर रोडवर बनावट दारूसाठ्याची वाहतूक, राज्य उत्पादन शुल्काची कारवाई, लाखांचा मुद्देमाल जप्त