जळगाव, 10 ऑगस्ट : गेल्या काही दिवासांपासून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापायला सुरूवात झालीय. मराठवाडा दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी जोरदार भाषण करत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत थेट इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
राज ठाकरेंचा पवार-ठाकरेंना थेट इशारा –
छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांसोबत संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, माझ्या दौऱ्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी सुरू केला. पण उद्या माझे मोहोळ उठले ना यांना निवडणुकीला एकही सभा घेता येणार नाही. यामुळे त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. मागे म्हटले होते की यांच्याकडे प्रस्थापित आहेत. पण माझ्याकडे विस्थापित आहेत. माझ्या नादी लागू नका, असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला.
शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप –
राज ठाकरे पुढे म्हणाले की, पुढच्या तीन साडेतीन महिन्यात त्यांना दंगली घडवायच्या आहेत. तेही फक्त मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून शरद पवार यांचे राजकारण पाहिले तर जेम्स लेन प्रकरणापासून सुरू केले. ते स्टेप बाय स्टेप सुरू आहे आणि जातीबद्दल प्रेम वर्षानुवर्ष आहे. फक्त महाराष्ट्रात नव्हे, देशातही आहे. पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार यांनी सुरू केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
समाजात कशाला भांडण लावत आहात? –
तुम्हाला तुमचे राजकारण करायचे आहे. समाजात तेढ निर्माण करून विष कालवून यांना कोणते राजकारण करायचे आहे. आणि म्हणून यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे. यांना वाटते आमचे एवढे खासदार आले. आणि त्या खासदारांवर जाऊ नये. तुमचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल तर तुम्ही राजकारण करताना त्या पद्धतीने बोलले पाहिजे. समाजात कशाला भांडण लावत आहात, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.