जळगाव, 13 ऑक्टोबर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेली गट-गणानुसार आरक्षणाची सोडत आज 13 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. दरम्यान, या सोडतीनंतर प्रत्येक गटातील आरक्षणाचे स्वरूप स्पष्ट होणार असून, आगामी निवडणुकांच्या राजकीय समीकरणांवर याचा थेट परिणाम होणार आहे.
गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर –
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण सोडत जळगावातील जिल्हाधिकारी कार्यातील नियोजन भवनाच्या सभागृहात दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. तर दुसरीकडे पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षण सोडत ही दुपारी 12 वाजता तालुकास्तरावर पार पडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी गट व गणांची रचना आधीच निश्चित करण्यात आली आहे. आता आरक्षणाच्या सोडतीनंतर प्रत्येक गट आणि गण यामध्ये सामान्य, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय या प्रवर्गानुसार जागांचे आरक्षण निश्चित होईल.
इच्छुक उमेदवारांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष –
राजकीय पक्ष तसेच संभाव्य उमेदवारांनी मागील काही दिवसांपासून आपल्या गटातील आरक्षणाचे गणित मांडण्यास सुरुवात केली होती. मात्र, आज होणाऱ्या सोडतीनंतरच प्रत्येक गटाचे आरक्षण ठरल्याने, अनेक इच्छुकांचे राजकीय भविष्य या सोडतीवर अवलंबून आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, विद्यमान सदस्य तसेच नवीन चेहरे या आरक्षण प्रक्रियेकडे लक्ष ठेऊन आहेत.
सोडतीनंतर राजकीय हालचालींना येणार वेग –
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज एकदा आरक्षण निश्चित झाल्यानंतर उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार नियोजन आणि संघटनात्मक तयारीला वेग येणार आहे. राजकीय वर्तुळातही या सोडतीला मोठे महत्त्व लाभले आहे. तर दुसरीकडे राज्यातील घटक पक्षांमध्ये असलेल्या युती-आघाडी ही स्वबळावर लढणार की एकत्र लढणार हे देखील लवकरच स्पष्ठ होणार आहे.
हेही वाचा : महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे